नेवासा – आपल्याला आयुष्यात आलेले अठराविश्व दारिद्र्याचा सामना करत असतांना जीवनाच्या खडतर प्रवासात आपल्यावर बेतलेली परिस्थिती पुन्हा मुलांच्या वाट्याला येवू नये म्हणून सायकलवर बटरपाव विकत मिळेल ते काम करुन मुलांची दारिद्र्यातून सुटका करण्यासाठी हातावर पोट भरणाऱ्या अशोक पेहरकर व रंजना पेहरकर या दाम्पत्यांनी दोन मुली डॉक्टर बनविल्या असून तिसरी मुलगी कायद्याचे शिक्षण घेत आहे.
पेहरकर कुटूंबियांनी आता त्यांच्या एकुलत्या एक मुलाचेही माध्यमिक शिक्षण पुर्ण करण्याचा चंग बांधलेला आहे. जिद्द असेल तर संकटावरही मात करता येवू शकते ? या पेहरकर कुटूंबियांच्या यशोगाथेवर दैनिक प्रभात’ने टाकलेला हा समाजातील वास्तवतेचा एक प्रकाशझोत…
मुळचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील कोरडवाहू भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येसगांव दिघी येथील पंढरीनाथ पेहरकर व त्यांच्या पत्नी बबनबाई पेहरकर हे कुटूंबिय आपल्या उपजिवेकेच्या शोधार्थ नेवासा तालुक्यातील भानसहिवरे या गावी आले. सुरुवातीच्या काळात त्यांनी येथील चंगेडे व साळुंके घराण्याची धुणे – भांडी केली तर त्यांच्या पतीने मिळेल ते काम करुन आपल्या एकुलत्या एक मुलाचे पालनपोषण केले.
पुढे बबनबाईचे निधन झाल्यानंतर तीन मुलांसह त्यांच्या वडीलांना स्वयपांक करुन घालण्याची पंचाईत सुरु झाली अखेर मोठ्या मुलाचे बारावी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर बापाने अशोक या मुलाचे लग्न लावून दिले.
अशोक पेहरकर या मुलानेही आयुष्यात खुप अपार मेहनत घेतली पावबटर विकले, मिळेल ते काम केले, त्यालाही पुन्हा तीन मुली आणि एक मुलगा झाला. आई – वडीलांसह आपल्याला आलेल्या दारिद्र्यातून आती सुटका करुन घेण्यासाठी अशोक पेहरकर व त्यांच्या पत्नी रंजना पेहरकर यांनी जिद्दीच्या जोरावर कामधंदा करुन पोटभरणाऱ्या पेहरकर कुटूंबियांनी श्रुती आणि जान्हवी या दोन मुलींना वैद्यकिय शिक्षण देत डॉक्टर बनविल्या तर तिसरी मुलगी अस्मिता एल्.एल्.बी.च्या दुसऱ्या वर्षाला असून ती आता वकिल बनणार आहे, तर मुलगा इयत्ता पाचवीमध्ये शिकत असून त्यालाही मोठे करण्याचे स्वप्न पेहरकर कुटूंबियांनी आखलेले आहे.
आजही पेहरकर यांची अत्यंत हालखीची परिस्थिती आहे. मुलींच्या शिक्षणाची प्रगती झाली पण आजही त्यांच्या घरात बसायला खुर्ची नाही. कोणी घरी पाहूने आले तर घरातील एका व्यक्तीलाच बाहेर झोपावे लागते. मात्र या परिस्थितीशी दोनहात करुन अशोक पेहरकर कुटूंबिय धाडसाने ‘झुंज’ देत आई – वडीलांसह आपल्या वाटेला आलेल्या गरिबीचा ‘भोग’ मुलांच्या वाट्याला येवू नये म्हणून काबाडकष्ट करत पेहरकर कुटूंबियांनी कष्टातून ही किमया साध्य केलेली आहे.
रंजना व अशोकराव पेहरकर कुटूंबियांनी दैनिक प्रभात’शी बोलतांना सांगितले की, आमच्या आई – वडीलांसह आमच्या वाट्याला आलेला खडतर प्रवासाचा मुकाबला केला.. कामाची कधीही लाज बळागली नाही.. म्हणूनच आम्ही आमच्या मुलांना दिशा देवू शकलो.