पवनानगर, {नीलेश ठाकर} – नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने पक्षीही नवीन बदल स्वीकारण्याचा प्रयत्न करीत आहे. केवळ घरट्यांच्या जागा नव्हे तर घरटे बांधणाऱ्या साहित्यातही बदल झाले असल्याचे पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे. प्लास्टिक पाण्याच्या बाटल्यांची छोटी झाकणे, त्याच्यावरील छोट्या रिंग, बुटाच्या नाड्या, नायलॉनचे धागे, कपड्यांची बटणे, चष्म्याच्या काड्याही घरट्यांमध्ये शिरल्या आहेत. पुरेसे नैसर्गिक साहित्य मिळत नसल्याने तडजोड करून घरटी बांधण्याची वेळ पक्षांवर आली आहे.
मावळ तालुक्यातील शहरी भागात उंच, ढोली असलेली झाडे कमी झाली आहेत. झाडांच्या जंगलाच्या जागी सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. त्यामुळे मोबाइल टॉवर, होर्डिंगचे कोपरे, चौकातील मोठ्या दिव्यांच्या खांबावर शिकारी पक्षी तर काही पक्षी इमारतींच्या कानाकोपऱ्यात घरटी बांधत आहेत. वाढत्या शहरीकरणामुळे अनेक पक्षी अस्तित्त्वाची लढाई लढत आहेत.
ज्यांना काळानुसार बदलता आले नाही, त्या पक्ष्यांनी शहराकडे पाठ फिरवली आहे. चिमण्यांनी नव्या जीवनशैलीनुसार गजबजलेल्या शहरात बस्तान बसवले आहे. घार, कावळे, करकोचांची घरटी उंच झाडांएवजी मोबाइल आणि उंच होर्डिंगवर बांधली जात आहेत. सूर्यपक्षी, शिंपी, बुलबुल या पक्ष्यांनी गॅलरीत फुलणाऱ्या छोट्या बागांमध्ये कुंड्यांच्या आडोशाला घरट्यांसाठी सुरक्षित जागा मिळवली आहे.
कबुतरांनी सोसायट्यांचे कोनाडे, एसीचे बॉक्स बळकावले आहेत. घरट्यासाठी साहित्य उपलब्ध होत नसल्याने त्याच्याशी मिळते-जुळते साहित्य घरट्यांसाठी वापरले जाते आहे. मोठ्या पक्ष्यांना त्रास होत नाही, पण पिलांसाठी प्लास्टिक तुकडे, नायलॉनचे दोरे धोकादायक आहेत. जन्माला येताना पिलांना पिसे नसतात. उन्हाळ्यात प्लास्टिक तापल्यावर त्याचा पक्ष्यांना चटका बसू शकतो किंवा ते टोचू शकते. यातून त्यांना त्वचेचे आजारही होतात. होर्डिंगवर घरटे करणाऱ्यांना पक्ष्यांनाही रात्रीच्या दिव्याचा त्रास होतो.
पक्षांसाठी एवढे तरी करा
भविष्यातील मानवांच्या व सजीवांच्या पिढ्यांसाठी पक्षी व झाडांचे संरक्षण काळाची गरज आहे. सण अथवा धार्मिक विधींसाठी देवाला कापसाची हळदी- कुंकू लावलेली कापसाची माळ (गेज) घालण्याची पद्धत आहे. ही माळ दुसऱ्या दिवशी निर्माल्यात जाते. काही पक्ष्यांना घरटी करताना कापसाची गरज असते. त्यामुळे ही माळ गच्चीतील झाडावर किंवा सोसायटीच्या बागेतील झाडांवर अडकून ठेवली पाहिजे. या कापसाचा पक्ष्यांना निश्चितच उपयोग होऊ शकतो, असे आवाहन पक्षी अभ्यासकांनी केले आहे.