पवनानगर (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झाडे फणसांनी बहरलेली आहेत. झाडांवर लागलेले फणसांचे फड पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. व्यापार किंवा व्यवसायासाठी इतर शेतीमालाप्रमाणे फणसाची लागवड केली जात नाही.
त्यामुळे, नैसर्गिकरित्या प्राप्त झालेल्या फणसाच्या विक्रीतून काही शेतकरी चांगली कमाई करत असतात. असेच नैसर्गिकरित्या तालुक्यातील डोंगर भागातील मोरवे, कोळेचाफेकर, आपटी, गेव्हंडे, आजिवली, चावसर, तुंगे आदी गावात व टाटा धरण क्षेत्रात असणाऱ्या झाडांवर फणसाचे फड लागल्याचे दिसत आहे.
प्रामुख्याने मे महिन्यात हे फळ खायला येत असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत. ज्याप्रमाणे एकाच नारळाच्या झाडाला कधी कधी शेकडो नारळ लागतात, अशाच प्रकारे कधी कधी एका झाडाला सुमारे दोनशेच्या आसपास फणस लागल्याचे चित्र मावळमध्ये पहायला मिळत आहे. अशा झाडांजवळ जाऊन पर्यटक फोटोही काढतात.
फणसाचे महत्त्व
■ जीवनसत्त्व ‘ए’, ‘सी’, रायबोफ्लेव्हिन, निअँसिन, थायमिन आणि फोलेट हे घटक.
■ आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक मॅग्नेशिअम, कॅल्शिअम, लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, कॉपर, झिंक आणि सेलेनियम ही खनिजे.
■ फणसापासून ११ टक्क्यांपर्यंत फायबर मिळते.
■ कोणत्याही प्रकारची साखर नसल्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी चांगले फळ.