- शिफारस पत्रांसह करणार नागरिकांना मदत
पिंपरी – शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांचे लॉकडाऊनमुळे हाल सुरू आहेत. या नागरिकांना आत्मनिर्भर योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ दिला जाणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजपासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी यासाठी पुढाकार घेतला असून सर्वांना हा तांदूळ उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र शासनाच्या आत्मनिर्भर योजनेंतर्गत शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत माई ढोरे बोलत होत्या. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे व सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके उपस्थित होते. तांदूळ योजनेबाबत माहिती देताना महापौर म्हणाल्या, केंद्र शासनाकडून शिधापत्रिका (रेशनकार्ड) नसलेल्या व्यक्तींना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत दिला जाणार आहे. यासाठी येत्या 30 मे पर्यंत फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. या फॉर्मवर ओळख व मोबाइल क्रमांक देणे बंधनकारक आहे.
या नागरिकांना तांदूळ मिळण्यासाठी कोणतीच अडचण येऊ नये यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांच्या माध्यमातून फॉर्म उपलब्ध करून देणे, त्यावर ओळख व शिफारस देणे आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. यानंतर हा फॉर्म जवळच्या रेशनिंग दुकानदारांकडे जमा करावा लागणार आहे. फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख ही 30 मे असून जूनच्या पहिल्या आठवड्यात तांदूळ वितरण होणार आहे. शिधापत्रिका धारकांना ही योजना लागू असणार नाही.