मुंबई – गेल्या पंधरवड्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरीव वाढ झाली. इन्फोसिस कंपनीच्या शेअरच्या भावातही वाढ झाल्यामुळे आता या कंपनीचे बाजार मुल्य 8 लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
भारतामध्ये बाजारमुल्य 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असलेल्या केवळ तीन कंपन्या होत्या. आता त्यामध्ये इन्फोसिस कंपनीची भर पडली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बॅंकेचे बाजार मूल्य 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
क्लाऊड कॉम्प्युटिंग व डिजिटल क्षेत्रांमध्ये इन्फोसिस कंपनीने काम करण्यास सुरुवात केली आहे. आगामी काळामध्ये यामुळे इन्फोसिस कंपनीचा नफा आणि उलाढाल वाढेल असे गुंतवणूकदारांना वाटते. त्यामुळे या कंपनीच्या शेअरची खरेदी केली जात असल्याचे विश्लेषकांनी सांगितले