खालापूर, (वार्ताहर) – अतिवृष्टिमुळे दरवर्षी खोपोली शहरातील मुख्य गटारे – नाले तुंडूब भरल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होत असते. यावर्षी पूरपरिस्थिती निर्माण होवू नये यासाठी नगरपरिषदेमार्फत यंदाही नालेसफाई १ एप्रिलपासूनच सुरू केली आहे. शहरातील सर्व मोठी गटारे, ९० हून अधिक लहान – मोठया नाल्यामधील गाळ, माती, कचरा काढून नाले साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी दिली.
शहरात पावसाळ्यात नाले – गटारे तुंबून पूरस्थिती निर्माण होवू नये याकरिता खोपोली पालिका आरोग्य व बांधकाम विभागाच्या माध्यमातून विविध प्रभागातील लहान – मोठी गटारे नाले, सफाईचे काम हाती घेतले आहे. शहरातील भानवज – शास्त्रीनगर येथून येणाऱ्या नाल्यामुळे भाऊ कुंभार चाळ, गुलशन अपार्टमेंट, विणानगर परिसर, शिळफाटा येथील डिसी नगर आदी काही भागांमध्ये पावसाचे पाणी सखल भागात साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण होते.
तेथील नाले व मोठी गटारे यातील गाळ काडून पाण्याचा निचरा होण्यासाठी काम हाती घेतले आहे. एकूण ५० कर्मचारी काम करीत आहेत. छोटे नाले आहेत तेथे मनुष्यबळाचा वापर केला जात आहे. त,र मोठ्या नाल्यांमध्ये जेसीबी, पोकल, डपरचा वापर करीत कचरा, गाळ उचलला जाणार आहे. त्याची मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी पाहणी करीत आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत.