कर्जत, (वार्ताहर) – कर्जत तालुक्यात शेती हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहाचे साधन आहे. पाण्याची व्यवस्था असलेले शेतकरी हे शेती करतात आणि आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करत असून जिते गावातील प्रगतीशील शेतकऱयाने दोन एकर जमीनीवर हिरव्या मिरचीची शेती केली असून दररोज ५० हून अधिक किलो मिरची विक्रीसाठी काढणी ते करत आहेत.
कर्जत तालुक्यातील जिते गावातील शरद जाधव यांची शेती नेरळ, कशेळे रस्त्याच्या बाजूला या आहे. या रस्त्याच्या काही मीटर अंतरावरून उल्हास नदी वाहते. या नदीमध्ये बारमाही पाणी असते आणि त्याचा फायदा या भागातील शेतकरी उन्हाळी शेती करतात. शेतीमधून दरवर्षी विविध प्रकारच्या भाज्या आणि पालेभाज्या यांचे उत्पन्न घेणारे जाधव यांनी यावर्षी स्थानिक वडापाव विक्रेते आणि भाजीपाला विक्रेते यांची मागणी लक्षात घेऊन मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
त्यासाठी नेरळ येथील कृषी केंद्रातून लवंगी आणि सातेरी मिरची यांची बियाणे आणून रोपे तयार केली. दोन एकर जमिनीवर या रोपांची लागवड वाफ्यांवर केली. त्या वाफ्यांमध्ये पाण्याचे नियोजन केले. मार्च महिन्यापासून मिरचीचे पीक हाती येऊ लागल्यावर शरद जाधव यांनी लवंगी आणि सातेरी मिरचीचे ग्राहक शोधण्यासाठी नेरळ आणि कशेळे येथील बाजारात जाऊन भाजीपाला विक्रते आणि बटाटा वडा विक्रेता यांची भेट घेतली.
दररोज ५० ते ७० किलो मिरची विक्री होत असून बाजारात चांगला भाव मिळत आहे. शेतात शरद जाधव यांना त्यांच्या पत्नी शारदा जाधव आणि दोन्ही मुले यांची मदत होते. गिरीश जाधव आणि गौरव जाधव हे दोघे मिरची काढून बाजारात विक्रीचे काम करतात. तर, शरद जाधव पाण्याचे नियोजन करतात. या शेतातून निघणारी मिरची किरकोळ बाजारात १०० रुपये दराने विकली जात आहे. तर होलसेल बाजारात ७० ते ८० रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे मिरचीची शेती करण्याचा उपक्रम यशस्वी झाल्याचे जाधव कुटुंबीयांनी सांगितले.