पिंपरी -सध्या सूर्य आग ओकत आहे. सिग्नलवर काही सेंकदसुद्धा उभे राहणे वाहनचालकांना नकोसे होत आहे. अशा भयंकर परिस्थितीतही शरीराचा दाह करुन घेत वाहतूक पोलीस वाहतूक नियमन करत आहेत. उन्हामुळे शाररीक व्याधीही सहन कराव्या लागतात.
सकाळी आठ वाजताच सूर्याची किरणे तळपू लागतात. एकीकडे नागरिकांना घराबाहेर पडू वाटत नाही. मात्र नाईलाजास्तव कामावर जावे लागते. तर दुसरीकडे रणरणत्या उन्हातही चौकात थांबून पोलिसांना वाहतुकीचे नियमन करावे लागते. अनेकदा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करताना ते अरेरावीशी वागतात. तर दुसरीकडे वाहन चालकांशी सौजन्याने वागा, असा संदेश देतात. एकीकडे उन्हाने शरीर तापते तर दुसरीकडे वाहन चालकांच्या अरेरावीमुळे रागाचा पारा चढतो. अशा परिस्थितीतही डोक्यावर बर्फ ठेवल्याप्रमाणे वागावे लागते.
गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा 40 ते 42 अंशाच्या दरम्यान आहे. अशा परिस्थितीत कडक उष्माघाताचीही तमा न बाळगता वाहतूक पोलीस उभे असतात. कधी-कधी पाच-दहा मिनिटांकरिता सावलीत गेले तरी वाहतूक नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेशद्वारे विचारणा होते की चौकातील वाहतूक पोलीस दिसत नाहीत. वाहन चालकाला पोलीस दिसतील अशा ठिकाणी उभे राहावे. डोक्यातील टोपीमुळ शरीराच्या उष्णेतेत वाढ होते. दिवसभर उन्हात उभे राहून डोकेदुखी, ऍसिडिटी, पायांची जळजळ असा त्रास होतो. रात्री घरी गेल्यावरही लवकर झोप येत नाही. कधीकधी मुले किंवा पत्नीला पायाला तेल लावून द्यायला सांगावेसे वाटते. मात्र दररोज आपली सेवा कोण करणार, असा विचार मनात येतो, या शब्दांत एका वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने आपली व्यथा मांडली.
सहन करण्यापलिकडे
उन्हापासून बचाव करण्यासाठी आणि शारीरिक तापमान कमी करण्यासाठी वारंवार पाणी प्यावे लागते. घरून आणलेली पाण्याच्या बाटलीतील पाणीही गरम होते. अशावेळी विकतची थंडगार पाण्याची बाटली खरेदी करावी लागते. दररोज साधारणतः 20 पावत्या होतात. त्यातूनही दोन-तीन वाहन चालक हुज्जत घालतात. काही वाहन चालक वरिष्ठांकडेही तक्रार करतात. अशावेळी वरिष्ठांचे बोलणे उन्हापेक्षाही नकोसे होते. नव्याने भरती झालेले तरुण पोलीस कर्मचारी शारीरिक बळाच्या जोरावर हे सर्व सहन करतात. मात्र निवृत्तीच्या जवळ आलेल्या पोलिसांना हे सर्व सहन करण्यापलिकडे असते.