भोर -राजगड सहकारी साखर कारखान्याचे निवडणुकीसाठी आज (दि. 29) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दिवशी 45 इच्छुकांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली.
कॉंग्रेसकडून 29, राष्ट्रवादी व शिवसेना मिळून 13, तर भाजप कडून तिघा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे पॅनल विरोधात महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी-शिवसेनेने विरोधी भाजपशी जुळवून घेत कारखचाना निवडणुकीपुरती युती केलेली आहे.
यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारखाना निवडणुकीत 6 गटांतून 17 संचालक निवडून द्यायचे आहेत. दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी 2 मे रोजी होणार आहे. पात्र उमेदवारांची यादी 4 मे रोजी जाहिर होणार आहे.
तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 5 मे ते 18 मे असून निवडणुक चिन्हांचे वाटप उमेदवारांना19 मे रोजी केले जाणार आहे. 29 मे रोजी मतदान होणार असून 31 मे रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.