राजगुरूनगर: राजगुरुनगर परिसरात मका पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने कणीस लागण्याधीच मक्याचा कोंब अळी खात असल्याने वाढ रखडली आहे. निसर्गाचा नव्हे तर मका बियानातच कीड निर्मितीची प्रयोग झाल्याचा आरोप मका उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.
खेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात मका पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. यावर्षी तालुक्यात सुमारे ५ हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रात मका पिकाची लावगड करण्यात आली आहे. चांगला भाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकरी दर्वावर्षी मका पिक मोठ्या प्रमाणात खरीप हंगामात घेत आहेत. गोल्डन मका घेण्याकडे शेतक-यांचा मोठा कल आहे. यावर्षीही आहे. मका पिकाच्या बियाणाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने जवळपास २ हजार रुपये किलोने बियाणे शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे.
राजगुरुनगर परिसरात मका पिकावर एका विशिष्ट प्रकारच्या अळीने हल्ला चढवला असल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांची मका पिकाचीपेरणी केली असल्याने मका पिक सर्वसाधारण दोन ते फुट उंच आले आहे. मात्र पिकाच्या गाभाऱ्यात पानांच्या रोल मध्ये हि आळीची अचानक वाढ होत असून ती मक्याचा कोंबच खात असल्याने पिकाची वाढ होत नाही यामुळे पुढे येणारे मकाचे कणीस तयार होत नाही. ही कीड इतकी पसरली आहे कि मक्याच्या प्रत्येक रोपाला ती आहेच. यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या लक्षात आणून देवून किडीचे व्हिडीओ सादर केले आहेत मात्र त्यांच्याकडून शेतकऱ्यांना पाहिजे तसे मार्गदर्शन होत नाही. जर जमीन कसदार आहे तर कीड कशी काय तयार झाली हा संशोधनाचा विषय बनला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मका पिकाचे बियाणे तयार करताना त्यात रासायनिक प्रकिया करून कीड निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
राजगुरुनगर परिसरातील कोहिनकरवाडी, सांडभोरवाडी, सातकरस्थळ बुट्टेवाडी, टाकळकरवाडी, मांजरेवाडी, कडूस, चास, दोंदे, शिरोली पाईट या परिसरात मोठ्या मका पिक अळीच्या भक्षस्थानी पडले आहे.मक्याच्या कोंबात असलेली अळी नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असून चुन्याची निवळी-निरमापावडर, रासायनिक औषधांची फवारणी केली जात आहे. मात्र ही कीड औषधांनी मारत नाही. ती मक्याच्या नव्या कोम्बाच्या आत पानात दडलेली असल्याने तिच्यावर औषधांचा उपयोग होत नाही. या किडीचे प्रमाण वाढतच चालले आहे.
याबाबत मका उत्पादक शेतकरी कुंडलिक कोहिनकर, पांडुरंग कोहिनकर, माणिक मुळे यांनी सांगितले कि, मक्यात किडीचे प्रमाण जास्त आहे वातावरणातून आणि जमिनीतून हि कीड तयार झाली नसून ती बियानातून आली आहे. पांढऱ्या व हिरव्या रंगाच्या या आळ्या असून त्या मक्याच्या कोंबातुन बाहेर काढल्यानंतर काही सेकंदात मरून जातात. मका मात्र उध्वस्त करतात. केमिकल खाण्यासाठी हि कीड निर्मिती होत आहे मक्याचा गाभा कुरतडत आहे. यात एक वेगळी यंत्रणा कार्यरत आहे. याबात तक्रार कोणाकडे करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी अधिकारी याची दखल घेत नाही. बियाणे निर्माण करणाऱ्या कंपन्याची चौकशी झाली पाहिजे.
याबाबत राजगुरुनगर येथील कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांच्याशी संपर्क केले मात्र त्यांना या किडीबाबत, ती नष्ट करण्याच्या औषधांबाबत माहिती नसल्याची सांगण्यात येत आहे. तालुक्यात काम करणाऱ्या कृषी कर्मचारी शेतकऱ्यांना सहकार्य करीत नाहीत उलट बियाणे उत्पादकांची पाठराखण करीत असल्याचा आरोप शेतकरी करीत असून याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मका पिकावर अज्ञात अळीचा हल्ला झाल्याने उभी पिके वाया जात असून या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.