मुंबई – वेस्ट इंडीजचा संघ भारतात येत असून, या दोन संघात एकदिवसीय तसेच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघ यापूर्वीच जाहीर केला होता. मात्र, आता शाहरुख खान व साई किशोर या आणखी दोन खेळाडूंना राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आले आहे.
वेस्ट इंडीजविरुद्ध भारतीय संघ घरच्या मैदानावर तीन एकदिवसीय सामने तसेच तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेला येत्या रविवारपासून प्रारंभ होत आहे.
भारतात करोनाची तिसरी लाट कायम असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, संघातील कोणत्या खेळाडूला करोनाची बाधा झाल्यास किंवा सौम्य लक्षणानंतरही त्याला विलगीकरणात राहावे लागल्यास या खेळाडूंना संघात स्थान मिळावे अशा हेतूने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे.
शाहरुख खान हा तामिळनाडूच्या रणजी संघाचा मधल्या फळीतील फलंदाज आहे. त्याने फिनिशर अशी बिरुदावली आयपीएल स्पर्धेतही सिद्ध केली होती. त्याच्यासह फिरकी गोलंदाज साई किशोरलाही राखीव खेळाडूंमध्ये घेण्यात आले असून, या दोघांसह तामिळनाडूच्याच वॉशिंग्टन सुंदरचा वेस्ट इंडीज विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.