Ind vs Wi 1st Test : वेस्ट इंडिजविरुद्ध डोमिनिका येथे झालेला पहिला क्रिकेट कसोटी सामना भारतानं एक डाव आणि 141 धावांनी जिंकला आहे. आपला पहिला डाव 5 गडी बाद 421 धावांवर घोषित केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी यजमान संघाला दुसऱ्या डावात 130 धावांमध्येच गुंडाळलं आणि सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी विजय संपादन केला.
या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात वेस्ट इंडिजने 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिला डाव 5 बाद 421 धावांवर घोषित केला. टीम इंडियाला 271 धावांची आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 130 धावांत गारद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने सामना जिंकला. या विजयासह रोहित शर्माच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी इतिहासात 23 वा विजय मिळवला आहे. भारताने फक्त ऑस्ट्रेलिया (32) आणि इंग्लंड (31) विरुद्ध अधिक कसोटी जिंकल्या आहेत. भारताने न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा प्रत्येकी 22 वेळा पराभव केला आहे.
यशस्वी ठरला सामन्याचा मानकरी….
भारताकडून या सामन्यात यशस्वी जैस्वाल (171) आणि रोहित शर्मा (103) यांनी शतकी खेळी खेळली. विराट कोहलीने (76) अर्धशतक ठोकले. टीम इंडियाला केवळ एका डावात फलंदाजीची संधी मिळाली. रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीत टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात सात बळी घेतले. पहिल्या डावात 171 धावा केल्याबद्दल यशस्वीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
अश्विनची विक्रमी कामगिरी…
अश्विनने या सामन्यात एकूण 12 विकेट घेतल्या. त्याने भारतासाठी आठव्यांदा एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये अश्विनने अनिल कुंबळेची (आठ) बरोबरी केली. हरभजन सिंगने पाच वेळा एका सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या. याशिवाय अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध सहाव्यांदा डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटीत अशी कामगिरी करणारा तो दुसरा गोलंदाज ठरला. त्याने वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज माल्कम मार्शलला मागे टाकले. हरभजन सिंगने भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटीत पाच वेळा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.
आता दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा सामना 20 जुलैपासून त्रिनिदाद येथे होणार आहे. आशियाबाहेर भारताचा डावाच्या फरकाने हा सर्वात मोठा विजय ठरला.