पुणे : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याची आणखी एक संधी गमावल्यानंतर, टीम इंडियाने आता आपले लक्ष एकदिवसीय मालिकेकडे वळवले आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची सुरुवात 19 जानेवारी रोजी पार्ल येथील बोलंड पार्क येथे होणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारताचे नेतृत्व केएल राहुलकडे असेल, तर जसप्रीत बुमराहला या मालिकेसाठी उपकर्णधारपद देण्यात आले आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत एकूण 34 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 10 सामन्यांत भारताला विजय मिळाला आहे. तर 22 सामने गमावले. इतर दोन सामन्यांचा कोणताही निकाल लागला नाही.
जर आपण दोन्ही संघांमधील एकूण एकदिवसीय सामन्यांवर नजर टाकली तर, भारत आणि दक्षिण आफ्रिका 84 वेळा आमनेसामने आले आहेत, ज्यात भारताने 35 सामने जिंकले आहेत आणि 46 सामन्यांत दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. तीन एकदिवसीय सामन्यांचा निकाल लागला नाही.
असे असले तरी भारतीय संघाने 2017-18 मध्ये त्यांच्या मागील दौऱ्यात दक्षिण आफ्रिकेत संस्मरणीय एकदिवसीय मालिका खेळली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने सहा सामन्यांची मालिका ५-१ अशा फरकाने जिंकली होती.
यंदाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेच्या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेत दमदार कामगिरी केलेल्या भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीवर प्रकाश टाकणार आहोत.
1) युझवेंद्र चहल (5/22)- सेंच्युरियन, 2018
लेग-स्पिनर युझवेंद्र चहलने फेब्रुवारी 2018 मध्ये सेंच्युरियन येथे झालेल्या सहा सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 22 धावांत 5 बळी घेत दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी मोडून काढली होती. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि चहलच्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला 32.2 षटकात 118 धावांवर सर्वबाद केले.
चतुर फिरकीपटूने प्रथम क्विंटन डी कॉकला (२०) माघारी पाठवले. यानंतर खाया झोंडो (25) बाद केले. तर जेपी ड्युमिनी (25) आणि मॉर्नी मॉर्केल (1) यांना पायचीत केले. त्यानंतर चहलने ख्रिस मॉरिस (14) याला डीप कव्हरवर झेलबाद करून एकदिवसीय कारकिर्दीत प्रथमच एका सामन्यात पाच बळी मिळवण्याची कामगिरी केली.
यावेळी चहलचा जोडीदार डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनेही तीन बळी घेत दक्षिण आफ्रिकेचे फलंदाजांना चीतपट केले. 119 धावांचा पाठलाग करताना भारताने केवळ 20.3 षटकांत 9 विकेट्स राखून विजय मिळवला. शिखर धवन ५१ आणि कर्णधार कोहली ४६ धावांवर नाबाद राहिले.
2) मुनाफ पटेल (4/29) – जोहान्सबर्ग, 2011
जानेवारी 2011 मध्ये जोहान्सबर्ग येथे झालेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 191 धावांचे लक्ष्य दिले होते. या आश्चर्यकारक विजयात मुनाफ पटेल हा भारताच्या विजयाचा नायक ठरला. भारताने 47.2 षटकांत 190 धावा केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ हा पाठलाग करण्यात अयशस्वी ठरला.
या उंच वेगवान गोलंदाजाने सलामीवीर हाशिम आमला (4) याला अप्रतिम चेंडूंवर माघारी पाठवून भारताला लवकर यश मिळवून दिले. दिली. दक्षिण आफ्रिकेची दुसरी विकेट 33 व्या षटकात पडली जेव्हा मुनाफने ग्रॅम स्मिथला 77 धावांवर बोल्ड केले.
8 बाद 188 धावांवर, यजमान सामना रंगतदार करण्यासाठी सज्ज दिसत होते. मात्र, मुनाफने मॉर्नी मॉर्केल (6) याला बाद करत भारताला खेळात राखले. त्यानंतर वेगवान गोलंदाजाने वेन पारनेलला (12) माघारी पाठवले. आणि मुनाफच्या या कामगिरीने भारताने थरारक समाना अवघ्या दोन धावांनी जिंकला.
3) हरभजन सिंग (3/27) – सेंच्युरियन, 2001
नुकताच निवृत्त झालेला हरभजन सिंग सामनावीर ठरलेल्या या सामन्यात भारताने ऑक्टोबर 2001 मध्ये सेंच्युरियन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 234 धावांचे माफक लक्ष्याचा बचाव करत विजय मिळवला होता. तिरंगी मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात, माजी फिरकीपटू हरभजनने 27 धावांत 3 बळी घेतले त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 46.2 षटकांत 192 धावांत आटोपला.
या सामन्यात हरभजनने सेट झालेल्या जॅक कॅलिसला 29 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर लगेचच त्याने अष्टपैलू निकी बोजेला 9 धावांवर पायचीत करून माघारी पाठवले. पुढे हरभजनने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार शॉन पोलॉक (15) याचाही असाच बळी घेतला.
तीन महत्त्वाच्या फलंदाजांना बाद करण्याव्यतिरिक्त, हरभजनने षटकात तीनच्यापेक्षा कमी धावगती ठेवत नियंत्रीत गोलंदाजी केली होती. अजित आगरकर, अनिल कुंबळे आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ‘टर्बनेटर’ला साथ देत प्रत्येकी दोन बळी घेतले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर सौरव गांगुलीच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली होती. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार शॉन पोलॉकच्या पाच बळींमुळे भारताला जास्त धावा करता आल्या नाहीत. भारताकडून राहुल द्रविडने सर्वाधिक ५४ धावा केल्या तर युवराज सिंगने ४२ धावा केल्या. सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागनेही ३० धावा केल्या. पण हरभजनने माफक धावसंख्येचे रूपांतर विजयात केले.