नवी दिल्ली – भारत व न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत भारतीय संघ प्रमुख खेळाडूंविना उतरत असल्याने न्यूझीलंडला एक विक्रम साकारण्याची संधी मिळाली आहे. या दोन संघात भारतातच झालेल्या 11 मालिकांमध्ये न्यूझीलंडला एकदाही विजय मिळवता आलेला नाही. 9 मालिका भारताने जिंकल्या आहेत तर, दोन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. भारताला भारतातच कसोटी मालिकेत पराभूत करण्याची संधी यंदा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला मिळाली आहे.
न्यूझीलंडचा आतापर्यंत भारतामध्ये एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्याचबरोबर भारताच्या संघातील महत्त्वाच्या खेळाडूंनी या मालिकेमधून विश्रांती घेतली आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत भारताची कामगिरी कशी होते याकडे लक्ष राहणार आहे. आजवर न्यूझीलंडच्या एकाही कर्णधाराला भारताला त्यांच्याच भूमीत पराभूत करता आलेले नाही.
विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने भारताला जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभूत केले होते. त्यानंतर टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतही न्यूझीलंडकडून भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.
तसेच 2019 मध्ये झालेल्या इंग्लंडमधील विश्वकरंडक स्पर्धेतही न्यूझीलंडनेच भारताला उपांत्य फेरीत पराभूत केले होते. त्यामुळे आता कसोटी मालिकेत विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडचा संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.