अहमदाबाद – कसोटी मालिका जिंकल्यावर भारतीय संघ आता इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी सज्ज बनला आहे. मात्र, या मालिकेसाठी अंतिम अकरा खेळाडूंचा संघ निवडण्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाला कसरत करावी लागणार आहे. त्यातच प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत सेकंड बेंच खेळवण्याबाबतही विचार केला जाऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.
टी-20 मालिकेसाठी अंतिम 11 मध्ये कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची असा मोठा प्रश्न भारतीय संघ व्यवस्थापनासमोर निर्माण झाला आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होणार असून त्याच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. अंतिम संघातील 11 जागांसाठी 19 खेळाडू उपलब्ध आहेत. यातील काही स्थानासाठी खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे.
शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड कशी होते, हे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांच्या निर्णयावर ठरणार आहे. आधी मालिका विजय निश्चित करू व नंतरच सेकंड बेंचला संधी देऊ, असा विचारही केला जाऊ शकतो. भारतीय संघासाठी मालिकेचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. पहिल्या तीन लढतींसाठी एकच संघ असू शकतो. अंतिम संघात कसोटी मालिकेत अफलातून फलंदाजी केलेल्या यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला स्थान मिळण्याची शक्यता आहे. अर्थात त्यामुळे लोकेश राहुलचे संघातील स्थान धोक्यात येऊ शकते.
सलामीवीर म्हणून शिखर धवन आणि रोहित शर्मा हीच जोडी कायम असेल. कर्णधार विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. त्यानंतर पंत पाचव्या आणि हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. अशा स्थितीत चौथ्या क्रमांकाच्या जागेसाठी श्रेयस अय्यर व सूर्यकुमार यादव या मुंबईकरांमध्येच स्पर्धा रंगू शकते. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार जवळपास 15 महिन्यांनंतर संघात परतत आहे. तसेच दीपक चहर व शार्दुल ठाकूर यांच्यातही अंतिम संघात स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा होईल. त्यातही ठाकूरचे स्थान भक्कम असल्याचे सांगितले जात आहे.
फिरकी गोलंदाजांमध्ये युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर व अक्सर पटेल यांच्यात चुरस राहील. मात्र, त्यातही पटेलची निवड निश्चित मानली जात आहे. त्याची आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता चहल व सुंदर यांना मागे टाकू शकते. वेगवान गोलंदाजांमध्ये टी नटराजन व नवदीप सैनी यांना संधी देण्यात येणार का असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे. इंग्लंडविरुद्ध 12 मार्च रोजी होत असलेल्या पहिल्या सामन्याने या मालिकेला प्रारंभ होत असून सर्व पाचही सामने याच मैदानावर रंगणार आहेत.
दुसऱ्या चाचणीतही वरुण अनफिट
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवडण्यात आलेला वरुण चक्रवर्ती याला आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्यात अपयश आले आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत घेतलेल्या पहिल्या चाचणीत अनफिट ठरलेल्या वरुणसाठी दुसरी चाचणी ही संधी होती. मात्र, त्यातही तो तंदुरुस्ती सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे.