बर्मिंगहॅम – भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याला आजपासून येथे प्रारंभ होत आहे. भरात असलेला यजमान इंग्लंड संघ या सामन्यावर वर्चस्व राखेल असेच चित्र दिसत असून भारतीय गोलंदाजी पाहता त्यांचेच पारडे जड राहणार आहे. दुसरीकडे ही कसोटी जिंकून तब्बल 15 वर्षांनंतर इंग्लंडला त्यांच्याच भूमीत कसोटी मालिकेत पराभूत करण्याची संधी भारतीय संघाला मिळाली आहे. मात्र, नियमित कर्णधार रोहित शर्मा करोनाबाधित असल्याने या सामन्यात खेळणार नसून त्याच्याजागी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नेतृत्व करणार आहे.
ठिकाण – एजबस्टन, बर्मिंगहॅम
वेळ – दुपारी 3 वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस
कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या सराव सामन्यात रोहितला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्याने विलगीकरण कालावधी पूर्ण केला होता. मात्र, पुन्हा केलेल्या चाचणीतही तो बाधित असल्याचेच स्पष्ट झाल्यामुळे त्याला आता या कसोटीत खेळता येणार नसून संघाचे कर्णधारपद बुमराहकडे सोपवण्यात आले आहे. काउंटी क्रिकेटमध्ये सरस कामगिरी केल्यामुळे मधल्या फळीतील फलंदाज चेतेश्वर पुजारा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र, त्याला आता या सामन्यातही मोठी खेळी करावी लागेल अन्यथा त्याची कसोटी कारकीर्द संपुष्टात येण्याचा धोका आहे.
लक्षवेधी
– कसोटीच्या वेळेत बदल
– दुपारी 3 वाजता सुरू होणार सामना
– खेळपट्टीवर गवत ठेवले असल्याचे स्पष्ट
– वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार
– तिसऱ्या दिवसांनंतर फिरकी गोलंदाजही निर्णायक
-कोहली अपयश पुसून काढणार का?
– सलामीवीरांसह पुजारावरही लक्ष
भारताची फलंदाजी पाहिली तर रोहितला कव्हर म्हणून मयंक आग्रवालला संघात स्थान दिल्यामुळे तोच शुभमन गिलसह डावाची सुरुवात करेल. त्यानंतर पुजारा, विराट कोहली, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा व यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत अशी तगडी फलंदाजी भारताकडे आहे. तसेच गोलंदाजीत कर्णधार व प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, महंमद शमी, महंमद सिराज व उमेश यादव यांच्यावर इंग्लंडच्या बलाढ्य फलंदाजीला रोखण्याचे आव्हान राहणार आहे.
अर्थात, भारतीय संघ चार वेगवान गोलंदाज घेऊन खेळणार का शार्दुल ठाकूर किंवा प्रसिद्ध कृष्णा यांच्यापैकी एकाला निवडून उमेश यादवला बाहेर ठेवणार याची चर्चा जास्त आहे. तसेच जडेजासारखा अष्टपैलू संघात असतानाही रवीचंद्रन अश्विनलाही खेळवणार का, हा देखील एक प्रश्न आहे.
दुसरीकडे इंग्लंडचा संघ जास्त तुल्यबळ वाटत आहे. त्यातही न्यूझीलंडच्या मालिकेतील कामगिरी पाहता जॉनी बेअरस्टो, कर्णधार बेन स्टोक्स व ज्यो रूट हे प्रचंड भरात असल्याने भारतीय गोलंदाजांसमोर खूप मोठे आव्हान राहणार आहे. ओली पोप्स, जॅक लीच, जॅक क्राउली, अलेक्स लीस अशी भक्कम फलंदाजी त्यांच्याकडे आहे. गोलंदाजीत जेम्स अँडरसनसह स्टुअर्ट ब्रॉड असल्याने भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. त्यातच जेमी ओव्हरटन, जॅक लीच हेदेखील गेल्या मोसमापासून सातत्याने सरस कामगिरी करत आहेत.
अँडरसनच प्रमुख अस्त्र ठरणार
इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन या कसोटीत खेळणार असल्याने भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे. तो या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्याने स्वतःआपण खेळणार असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याला जागतिक कसोटी कारकिर्दीत 650 बळींचा टप्पा पार करण्याची संधी आहे. त्याने ही कामगिरी केली तर तो अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच वेगवान गोलंदाज ठरणार आहे.
बुमराहच्या नेतृत्वावर लक्ष
तब्बल तीन दशकांपेक्षाही जास्त कालावधीनंतर एक वेगवान गोलंदाज भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. महान अष्टपैलू कपिल देव यांच्यानंतर संघाचे नेतृत्व करणारा तो पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. मात्र, कपिल यांच्याच पावलावर पाऊल ठेवत तो संघाची मोट कशी बांधतो व यश मिळवतो का, याकडे लक्ष राहणार आहे.