चिंबळी – भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या पात्रात पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून लाखो लिटर मैला व रसायनमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट सोडले जाते. या प्रकारामुळे परिसरातील शेतकरी वर्गानी संताप व्यक्त केला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या चिखली, कुदळवाडी परिसरात अनेक भंगार दुकाने व छोटे-मोठे उद्योग आहेत. त्यामधून सोडण्यात येणारे सांडपाणी ओढ्यातून सरळ नदीपात्रात मिसळले जाते. त्यामुळे हे पाणी पिण्यालायक देखील नाही. या मैलीमिश्रित पाण्याने या परिसरातील शेती आणि जीव दोन्हीही धोक्यात आले आहे. अशी प्रतिक्रिया कुरुळी, मोई, केळगाव, चिबळी परिसरातील शेतकरी वर्गानी व्यक्त केली आहे.
या पाण्यामुळे शेतीचे नुकसान झाले असून, मानवी आरोग्यावर आणि जलचर प्राणी यांनादेखील मोठा फटाका बसला आहे. या पाण्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढत आहे. नदीकडेच्या गावांमध्ये व वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुलांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. इंद्रायणी नदी लगत असणाऱ्या गावच्या पाण्याचे स्त्रोत प्रदूषित झाले आहेत.