नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरुन पाकिस्तानने भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला परंतू, त्यात त्याला काही यश आले नाही. त्यातच आता संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. भारताने काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशीर पाऊल उचलले असल्याचे विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत ठणकावून सांगितले.
Secretary (East) MEA at UNHRC: NRC is a statutory, transparent,nondiscriminatory legal process mandated& monitored by Supreme Court of India. Any decision that is taken during its implementation will comply with Indian Law & will be consistent with India’s democratic traditions. pic.twitter.com/TMA28HT1Rh
— ANI (@ANI) September 10, 2019
सामाजिक आर्थिक समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी आमचे सरकार प्रगतीशील धोरणात्मक निर्णय घेत आहे असे विजय ठाकूर सिंह म्हणाल्या. भारत आपल्या अंतर्गत विषयांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही हे भारताने स्पष्ट केले. पाकिस्तान खोटे आरोप करत असून प्रदेशातील जनतेच्या मानवी हक्काच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने जम्मू-काश्मीरचे नुकसान केल्याकडे त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले. पाकिस्तान दहशतवादाचे प्रमुख केंद्र असल्याचेही भारताने निक्षून सांगितले. दरम्यान, खुद्द पाकिस्ताननेच जम्मु-काश्मीर हा भारताचाच भाग असल्याची कबुली दिली आहे.