मुंबई – करोनामुळे आणि रशिया – युक्रेन युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था खवळलेल्या समुद्रासारखी झाली आहे. यामुळे अमेरिका, युरोप, चीनसह अनेक देशांच्या विकास दरावर नकारात्मक परिणाम होणार आहे. यामुळे जागतिक मंदीची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारताची स्थूल आणि वित्तीय अर्थव्यवस्था कमालीची मजबूत आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे खवळलेल्या समुद्रातील शांत बेटासारखी असल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.
बॅंकेचे पत धोरण जाहीर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दास म्हणाले की भारताचा या वर्षाचा विकासदर तब्बल 7.2% होणार आहे. इतर कोणत्याही देशापेक्षा भारताचा विकासदर जास्त राहणार आहे. त्याचबरोबर अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशातील महागाईचा दर 9% पेक्षा जास्त असताना भारतातील महागाईचा दर आठ टक्क्यापेक्षा कमी आहे. हा मागायचा दर कमी करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गेल्या तीन महिन्यात तीन वेळा व्याजदरात वाढ केली आहे.
त्याचबरोबर अमेरिकेचा डॉलर वगळता इतर देशांच्या चलनावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. मात्र भारतीय रुपया डॉलर वगळता इतर चलनाच्या तुलनेत मजबूत असल्याच्या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतातील कर संकलन वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरिपाच्या पेरणीने वेग घेतला आहे. अशा परिस्थितीमध्ये महागाई दीर्घकाळ वाढण्याची शक्यता कमी आहे.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने स्वतःचा खर्च वाढवला असला तरी भारताची वित्तीय तूट नियंत्रणात आहे. या सर्व बाबी मध्यम आणि दीर्घपलल्यात भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट करीत आहेत. मात्र भारतीय विकास दरावर काही प्रमाणात नकारात्मक परिणाम संभवतो.
दोन अकल्पीत घडामोडी
गेल्या तीन वर्षांमध्ये जागतिक पातळीवर दोन अकलपीत घडामोडी झाल्यामुळे विविध देशाच्या अर्थव्यवस्था अस्ताव्यस्त झाले आहेत. पहिली घडामोड म्हणजे करोनाचा प्रादुर्भाव. त्यामुळे इतर बरोबरच भारताला अडचणीचा सामना करावा लागला. दुसरी घडामोड म्हणजे रशिया – युक्रेन युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. तरीही इतर देश अडचणीत आले असताना भारताच्या अडचणी कमी आहेत असे ते म्हणाले.