दोहा: आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी अंगद वीरसिंह बाजवा आणि मायराज अहमद खान यांनी स्किट प्रकारात अनुक्रमे सुवर्ण आणि रजतपदकाची कमाई केली. ऐश्वर्य याने पुरुषांच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात ब्रॉंझपदक मिळवले. या कामगिरीमुळे भारताचे विक्रमी 15 नेमबाज टोकियो ऑलिम्पिकला पात्र ठरले आहेत.
भारताच्या तीन खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये स्थान निश्चित केल्यामुळे ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संघ सहभागी होईल. याआधी 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताचे 11 तर 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये 12 नेमबाज पात्र ठरले होते.
यावेळी 23 वर्षीय बाजवा आणि 44 वर्षीय मायराज यांनी अंतिम फेरीत प्रत्येकी 56 गुणांची कमाई करत अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर झालेल्या शूट-ऑफमध्ये अंगद सरस ठरला. कुवेतच्या हबिब सौद याला ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. मनू भाकर आणि अभिषेक वर्मा यांनी भारताच्याच सौरभ चौधरी आणि यशस्विनी सिंह देस्वाल यांचा 16-10 असा पाडाव करत 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याचबरोबर, कनिष्ठ एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात, ईशा सिंह आणि सरबज्योत सिंह यांनी कोरियाच्या मिनसेओ किम आणि युनहो संग यांच्यावर 16-10 अशी मात करत सुवर्णपदक पटकावले.
मध्य प्रदेशच्या ऐश्वर्य याने आठ जणांच्या अंतिम फेरीत 449.1 गुणांची कमाई करत तिसरे स्थान पटकावले. कोरियाच्या किम जोंगह्यून याने 459.9 गुणांसह सुवर्ण तर चीनच्या झोंगघाओ झाओ याने 459.1 गुणांसह रजतपदकावर नाव कोरले. ऐश्वर्य याने पात्रता फेरीत 1168 गुणांची कमाई केली होती. ऐश्वर्य याने चेन सिंग (1155) आणि पारूल कुमार (1154) यांच्यासह भारताला सांघिक ब्रॉंझपदकही प्राप्त करुन दिले.
ऐश्वर्यने कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत रायफल थ्री पोझिशन प्रकारात विश्वविक्रमाची नोंद केली होती. रायफल थ्री पोझिशन प्रकारात ऑलिम्पिकचे स्थान मिळवणारा ऐश्वर्य हा संजीव राजपूत याच्यानंतरचा भारताचा दुसरा नेमबाज ठरला आहे. सूमा शिरूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऐश्वर्य सध्या सराव करत आहे.