हिमांशू
सत्तास्थापनेचे ताणतणाव नेत्यांच्या हृदयापर्यंत जाऊन भिडले. “काय ठरलं होतं,’ या प्रश्नापासून सुरू झालेल्या चर्चा “पुढे काय ठरवायचं,’ या प्रश्नाच्या अवतीभोवती स्थिरावल्या. “दिल्लीपुढे झुकणार नाही,’ या निर्धारापासून सुरू झालेला प्रवास “दिल्लीहून निरोप येईल,’ या नेहमीच्या अगतिकतेपर्यंत पोहोचला आणि दिल्लीही अगतिक आहे, हे पाहून महाराष्ट्राच्या हृदयाचे ठोके पुन्हा वाढले. मातोश्री, वर्षा, सिल्व्हर ओक या पुनःपुन्हा घेतल्या जाणाऱ्या नावांच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला- लीलावती!
अविश्रांत धावपळ, अतिश्रम आणि वाढत्या ताणतणावांमुळे बिनीच्या शिलेदारांवर अँजिओप्लास्टीची वेळ ओढवली. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक मीडिया उभ्या महाराष्ट्राचे ब्लडप्रेशर वाढवत राहिलाय. “आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी…’ अशी अँकरची गगनभेदी आरोळी ऐकून वाटते, महाराष्ट्राला आता सरकार शंभर टक्के मिळाले! पण बातमी काय असते? अमके तमक्यांना भेटले. अमक्यांची गाडी तमक्यांच्या घरी निघाली. अमक्यांनी तमक्यांबरोबर “तब्बल’ 7 मिनिटे चर्चा केली. तमक्यांनी अमक्यांना फोन लावला… बैठका, फोन आणि भेटीगाठी… ठरलं काय? माहीत नाही! पण तरी “आतापर्यंतची सर्वांत मोठी बातमी…’ संकटकाळातल्या या गतिमान आणि धडाकेबाज वृत्तप्रसारणाने आमच्या हृदयाचा ताबा घेतला. बातम्यांच्या वेगाशी आमच्या हृदयाने इतके जुळवून घेतलंय, की बातम्या बंद केल्या तर हृदय बंद पडेल असे वाटू लागलेय. त्यामुळे हा वेग आता हळूहळू कमी करावा, अशी संबंधितांना विनंती!
हृदय हा खरोखर अत्यंत नाजूक अवयव आहे. कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय ताण हृदयाला सहन होतील इतकेच असावेत. “हीच ती वेळ’ असे म्हणून थोडा वेगळा विचार करून पाहू. हवामानशास्त्र खात्याने अनुकूल पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे कर्ज काढून शेताची मशागत केली जाते. बी-बियाणं, खतं, कीटकनाशकं महागामोलानं विकत घेतली जातात. पिकाच्या प्रत्येक टप्प्यात हवा तेवढा पाऊस पडेल का आणि तेवढाच पडेल का, ही धाकधूक सुरू होते. निसर्गचक्र बदलल्यामुळे पावसाची शाश्वती नसते. तरीसुद्धा हृदय घट्ट करून शेतकरी काम करत राहतो.
अखेर पीक काढणीला येतं. कापून ठेवलेलं पीक अवकाळी पावसानं भिजेल का, ही धाकधूक असतेच; शिवाय पीक बचावलं तरी बाजारात योग्य भाव मिळेल याचीही शाश्वती नसते. आलेल्या रकमेतून पीककर्ज वजा जाता किती रक्कम हातात उरेल, हे सांगता येत नाही. त्यातून पुढचे वर्ष कसं काढायचं आणि पुढच्या पिकासाठी गुंतवणूक कुठून आणायची, हा ताण सुगीच्या आनंदात मिसळतोच. शेतकरीच नव्हे तर कंपन्यांमधले कामगार-कर्मचारीही वर्षभर अस्तित्वाच्या धास्तीसह अनेक ताणतणावांना सामोरे जातात. वाढते ताण आणि वाढतं प्रदूषण यामुळे हृदयावरचं दडपण वाढलंय; पण त्याची क्षमता वाढलेली नाही!
दिल्ली हे भारताचे हृदय. तिकडून आलेला सांगावा धमन्यांमधून देशाच्या प्रत्येक भागात पोहोचतो. निर्णय घेतले जातात. पण दिल्लीकरांचं हृदयही प्रदूषणाचा मोठा आघात झेलतंय. प्रदूषणामुळे रक्तवाहिन्या अरुंद होऊन भारतीयांना हृदयविकाराचा धोका वाढलाय, असे संशोधन “इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमॉलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालंय. थोडक्यात, फुफ्फुसं, मूत्रपिंडं दोन-दोन असली, तरी हृदय एकच आहे आणि त्याच्यावरचे हल्ले वाढतायेत. धोके वाढत चाललेत. ते कमी करण्याचा उपाय एकच- एकवाक्यता… सर्वच बाबतीत!