नवी दिल्ली- जगातील इतर सर्व देशांमध्ये महिलांची सरासरी उंची वाढत असताना भारतीय महिलांची सरासरी उंची मात्र कमी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने केलेल्या एका सर्वेक्षणात हे चिंताजनक निष्कर्ष समोर आले आहेत.
प्लोस वन नावाच्या एका सायन्स जर्नलमध्ये याबाबतचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहेत. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये भारतातील श्रीमंत महिलांच्या सरासरी उंचीवर फारसा फरक पडला नसला तरी गरीब श्रेणीतील महिलांची सरासरी उंची कमी झाल्याचे या संशोधनातून पुढे आले आहे.
भारतातील आदिवासी समाजातील पाच वर्षे वयोगटातील मुलींची उंची ही इतर समाजातील याच वयोगटातील मुलींच्या तुलनेत सरासरी दोन सेंटिमीटरने कमी आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे या संस्थेने १९९८/९९ आणि २००५/२००६ आणि 2015 /16 या वर्षांमध्ये संशोधन करून त्यानंतर हे निष्कर्ष जाहीर केले आहेत.
या संशोधनाप्रमाणे सर्वात गरीब महिलांची उंची सरासरी पॉईंट ६३ सेंटिमीटरने सरासरी कमी झाली आहे तर तथाकथित उच्च श्रेणीत राहणाऱ्या महिलांची उंची पॉईंट २३ सेंटिमीटरने वाढलेली आहे.
म्हणजेच समाजातील ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. त्यांची उंची वाढत असून ज्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे त्यांच्या उंचीवर नकारात्मक फरक पडला आहे असे या संशोधनातील प्रमुख निष्कर्ष आहे.