पुणे – कोणतेही दडपण न घेता खेळाचा आनंद घ्या आणि सर्वोत्तम कामगिरी करा, कसून सराव करा , पौष्टिक आहार घ्या आणि भरपूर विश्रांती घ्या असा सल्ला भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने युवा खेळाडूंना दिला.
पीवायसी हिंदू जिमखाना क्लब येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष समारंभात उपस्थितांना संबोधित करताना तो बोलत होता. यावेळी भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीला पीवायसी हिंदू जिमखाना क्लबचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे,क्लबचे मानद सचिव सारंग लागु यांच्या हस्ते क्लबचे सन्मानीय सदस्यत्व देण्यात आले.
कोणत्याही लक्षाचा पाठलाग करताना स्वतःशीच स्पर्धा करावी लागेल आणि प्रत्येक दिवशी कालच्यापेक्षा सरस कामगिरी करावी लागेल. मला जेव्हा सर्वोत्तम कामगिरी करता येत नाही, तेव्हा त्याचा खूप त्रास होतो. सामना जिंकणे किंवा हारणे यापेक्षाही सर्वोत्तम कामगिरी करणे, हाच निकष असावा लागतो. भारतामध्ये गुणवतेची कमतरता नसून योग्य वेळात गुणवान खेळाडू शोधणे तसेच त्यांना योग्यवेळी सर्व सुविधा, साधने व प्रशिक्षण देणे शक्य झाल्यास आपल्यालाही जगज्जेते तयार करता येतील. स्त्री आणि पुरुषांच्या क्रीडा प्रकारात भेदभाव केला जात आहे. मुले आणि मुली या दोघांनाही सारख्याच संधी व सुविधा दिल्या गेल्या आहेत, असेही छेत्रीने म्हटले आहे.
निवृत्तीवर छेत्रीचे मौन
सर्वोत्तम कामगिरी करत राहण्यावर माझा विश्वास आहे मी खेळाचा पुरेपूर आनंद घेत आहेत आणि संघालाही माझा उपयोग आहे अशी खात्री असेपर्यंत मी खेळत राहील असे सांगून छेत्री म्हणाला की, मी आता गेली 21 वर्षे खेळातच आहे आणि यापूढेही खेळत राहीन. बेंगळुरू फुटबॉल क्लब हे माझे कुटुंबच असून या संघातच राहण्याचा निर्धार त्याने व्यक्त करताना निवृत्तीबाबत मात्र त्याने कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.