मुंबई: सौरव गांगुली भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी आल्याने भारतीय क्रिकेटमध्ये अनेक नवे बदल तर होतीलच पण प्रगतीदेखील होईल, अशा शब्दांत युवराजसिंगने आपल्या आवडत्या दादाचे कौतुक केले आहे.
गांगुली सर्वात यशस्वी कर्णधार आहे. क्रिकेटपटूंचे हित तो ध्यानात ठेवेल आणि खेळाडूंचे म्हणणेदेखील ऐकून घेईल, हे यापुर्वी कधीही झाले नव्हते. क्रिकेटपटूंना काय बोलायचे आहे किंवा त्यांची मते ऐकून घेतली जातील, असेही युवराज म्हणाला.
अनेक भारतीय खेळाडू थकलेले असले तरी, संघातील स्थान गमवावे लागेल या भीतीने विश्रांती घेत नाहीत, असेही युवराजने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या युवराजने सध्याच्या खेळाडूंच्या पाठीशी असल्याचे सांगत समर्थन केले. लोढा समितीच्या शिफारशीनुसार, भारतीय क्रिकेटपटू संघटना ही खेळाडूंची संघटना स्थापन करण्यात आली आहे.
त्यावेळी युवराजने पत्रकारांशी संवाद साधला. थकलेले असले किंवा जायबंदी असले तरी खेळावे लागेल हा खेळाडूंवर असलेला दबाव दूर झाला पाहिजे, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. यावेळी युवराजने ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचे उदाहरण दिले. मानसिक आरोग्याच्या कारणास्तव त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे आणि त्यांच्या क्रिकेट मंडळाने त्याला पाठिंबा दिला, असेही युवराज म्हणाला.