अंटिंग्वा – भारताच्या 19 वर्षांखालील युवा संघाने आयसीसी 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा 4 गडी राखून पराभव केला व विश्वविजेतेपद पटकावले. या स्पर्धेत नवा इतिहास रचताना भारतीय युवा संघाने विक्रमी पाचवे विश्वकरंडक विजेतेपद साकार केले.
इंग्लंडचा कर्णधार टॉम प्रेस्टने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय चुकीचा ठरवला. भरात असलेल्या रवी कुमारने पहिल्याच स्पेलमध्ये दोन गडी बाद केले. त्यानंतर राज बावाने जॉर्ज थॉमसला बाद केले. त्याने इंग्लंडच्या फलंदाजीची वाताहत करताना पाच गडी बाद केले. एकाबाजूने प्रमुख फलंदाज बाद होत असताना जेम्स रिव याने मात्र जिद्दीने फलंदाजी केली. 7 बाद 91 अशा बिकट स्थितीतून त्याने संघाचा डाव सावरला.
– स्पर्धेच्या इतिहासातील पाचवे विक्रमी विजेतेपद
– यापूर्वी 2000, 2008, 2012, 2018 साली मिळवले विजेतेपद
– राज बावाने निम्मा संघ केला गारद
– रवी कुमारच्या चार बळींमुळे इंग्लंडची वाताहत
– रवी व राजचे 65 धावांत 9 बळी
– बावा व सिंधूची मोलाची अर्धशतकी भागीदारी
त्याने तळातील फलंदाजांना हाती धरत संघाला दीडशतकी धावांची मजल मारून दिली. त्याने जेम्स सेलच्या साथित महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. मात्र, रीव आपले शतक पूर्ण करु शकला नाही. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडचे शेपूट जास्त वळवळणार नाही काळजी घेतली व त्यांचा डाव अवघ्या 44.5 षटकांत 189 धावांवर संपूष्टात आला. भारताकडून राज बावाने 5 तर रवी कुमारने 4 गडी बाद केले. कौशल तांबेने एक गडी बाद केला.
विजयासाठी 190 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारताच्या डावाची सरुवातही खराब झाली. सलामीवीर अंगक्रीष रघुवंशी डावातील पहिल्याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. यंदाच्या स्पर्धेत सातत्याने धावा करणारा शेख राशीद याने सलामीवीर हरनूर सिंगच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागीदारी केली व डाव सावरण्याचा प्रयत्न केला. याचवेळी हरनूर 21 धावांवर परतला. यानंतर उपांत्य सामन्यात दमदार शतकी खेळी करणारा भारतीय संघाचा कर्णधार यश धूलने निराशा केली. तो केवळ 17 धावांवर बाद झाला.
दुसरीकडे राशीदने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 84 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. मात्र, त्यानंतर तो देखील बाद झाला. कर्णधार धुल बाद झाला तेव्हा भारताच्या 4 बाद 97 धावा झाल्या होत्या. त्याचवेळी राज बावा आणि निशांत सिंधू यांनी संघाचा डाव सावरताना पाचव्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी कचत विजयाची खात्री दिली. बावा 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 54 चेंडूत 35 धावा करून बाद झाला. दुसरीकडे निशांतनेही अर्धशतक पूर्ण केले. यावेळी भारतीय संघाला 18 चेंडूत 12 धावांची गरज होती. बावाच्या जागी आलेल्या दिनेश बानाने दोन षटकार खेचत भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक – इंग्लंड – 44.5 षटकांत सर्वबाद 189 धावा. (जेम्स रीव 95, जॉर्ज थॉमस 27, जेम्स सेल्स नाबाद 34, राज बावा 5-31, रवी कुमार 4-34, कौशल तांबे 1-29). भारत – 47.4 षटकांत 6 बाद 196 धावा. (हरनूर सिंग 27, शेख रशीद 50, राज बावा 35, नीशांत सिंधू नाबाद 50, दीनेश बाना नाबाद 13, जोशुआ बोडेन 2-24, थॉमस अस्पीनवल 2-42, जेम्स सेल्स 2-51).
बानाचा धोनी स्टाइल फिनिश
भारतीय संघाचा 18 चेंडूत 12 धावांची गरज असताना 48 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर निशांत सिंधूने चौकार फटकावला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव पूर्ण करत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर दिनेश बानाने सलग दोन षटकार खेचले. त्याने षटकार मारून भारतीय संघाचा विजय साजरा केला. मात्र, हा षटकार पाहताना 2011 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध असाच षटकार खेचत महेंद्रसिंह धोनीने भारताला विश्वविजेता बनवले होते. याच षटकाराच्या धोनी स्टाइलनेच बानाने संघाचा विजय साकार केला. धोनीप्रमाणे बानादेखील एक यष्टीरक्षकच आहे.
तांबेचा अफलातून झेल
इंग्लंडचा फलंदाज जेम्स रीव जिद्दी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला होता. त्याला आपले शतक मात्र, पूर्ण करता आले नाही. 95 धावांवर असताना 44 व्या षटकात त्याने षटकार मारण्याचा प्रयत्न केला मात्र, भारताचा यष्टीरक्षक कौशल तांबे याने हा अत्यंत कठीण झेल सोपा करुन दाखवला. पुणेकर तांबेने घेतलेल्या या झेलाचे कौतुक सामना संपल्यावरही सुरु होते.
खेळाडू बनले मालामाल
युवा संघाच्या विश्वकरंडक विजेतेपदावर बीसीसीआयने लगेचच बक्षिसांची खैरात केली आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला 40 लाख रुपये तर सपोर्ट स्टाफमधील प्रत्येकाला 25 लाख रुपये बक्षिस जाहिर केले आहे.