नवी दिल्ली – भारताचे चंद्रावर यशस्वी लॅंडिंग झाल्यानंतर आता माणसांना अवकाशात पाठवण्याची भारताची तयारी सुरू झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने (ISRO) सांगितले की, महत्त्वाकांक्षी अशा “गगनयान’ मोहिमेसाठी (mission Gaganayaan) मानवरहित उड्डाण चाचणी लवकरच घेतली जाणार आहे.
सुमारे 900 कोटी रुपये खर्चाची ही मोहीम पुढील वर्षी सुरू होणार आहे. याआधी यासाठी तीन वाहनांच्या चाचण्या कराव्या लागतील. यापैकी पहिले वाहन चाचणी मिशन टीव्ही-डी-1 असेल, तर दुसरे मिशन टीव्ही-डी2 असेल. याच मोहिमेतली तिसरी चाचणी एलव्हीएम3-जी1 असेल आणि हे एक मानवरहित मिशन असेल. (ISRO mission)
इस्रोने सांगितले की, “गगनयान’चे चाचणी वाहन लवकरच लॉन्च केले जाईल. त्यामध्ये क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेता येईल. त्यासाठी फ्लाइट टेस्ट व्हेईकल ऍबॉर्ट मिशन अर्थात टीव्ही-डी ची तयारी सुरू आहे. रोबोट आणि ह्युमनॉइड्स (मानवासारखे रोबोट) अवकाशात पाठवून क्रूच्या सुरक्षेची खात्री केली जाणार आहे. “गगनयान’च्या तिसऱ्या वाहन चाचणी, एलव्हीएम3-जी1 अंतर्गत पाठवले जाणारे ह्युमनॉइड, क्रूसमोर येणाऱ्या सर्व आव्हानांची माहिती गोळा करेल. (Chandrayan 3))
सप्टेंबरमध्ये “गगनयान’ प्रकल्प संचालक आर हटन म्हणाले होते की, इस्रो या मोहिमेसाठी चार अंतराळवीरांना प्रशिक्षण देत आहे. ही भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना 400 किमीच्या कक्षेत पाठवून त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणले जाईल. “गगनयान’चे चाचणी वाहन पुढील महिन्यात लॉंच केले जाईल जेणेकरून क्रू एस्केप सिस्टमची चाचणी घेता येईल.
प्रणाली कधी वापरली जाते?
आपत्कालीन स्थितीत अंतराळवीरांना बाहेर काढण्यासाठी या प्रणालीचा वापर केला जाऊ शकतो. हटन यांनी सांगितले होते की, गगनयानच्या सध्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. हटन म्हणाले होते की अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे, चाचण्यांद्वारे आम्ही हे सुनिश्चित करू इच्छितो की क्रूला कोणतीही हानी होणार नाही.