बेंगळूरू – भारताचा दुसरा क्रिकेट संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. संघाचे नेतृत्व सलामीवीर फलंदाज शिखर धवन याच्याकडे सोपवण्यात येणार असून संघाच्या प्रशिक्षकपदी माजी कर्णधार व कसोटीपटू राहुल द्रविड याची नियुक्त केली जाणार असल्याचे जवळपास निश्चित करण्यात आले आहे.
भारताचे एकाच वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे दोन संघ खेळत असणार आहेत. भारताचा एक संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असेल तर दुसरा संघ श्रीलंकेत एकदिवसीय तसेच टी-20 मालिका खेळणार आहे. श्रीलंका दौऱ्यात होणाऱ्या प्रत्येकी तीन एकदिवसीय आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. या दौऱ्यासाठी भारताचा संघ अद्याप जाहीर झालेला नाही.
विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत देशाचे नेतृत्व करत असल्याने शिखर धवनकडेच नेतृत्व देण्यात येणार आहे. या दौऱ्यावेळी विराट, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, लोकेश राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, महंमद शमी हे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत असतील तर प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री देखील त्याच संघाबरोबर राहणार असल्याने श्रीलंका दौऱ्यासाठी द्रविडची प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.
या दौऱ्या आयपीएलमधील युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात खेळाडूंची कामगिरी कशी होते यावर निवडसमितीचे लक्ष असेल. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.
वाहिनीच्या ट्विटमुळे मिळाले संकेत
संघाचा कर्णधार कोण असेल याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली तरीही स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करत असलेल्या सोनी वाहिनीने केलेल्या एका ट्विटमुळे धवनच कर्णधार असेल हे स्पष्ट होत आहे. वाहिनीने या मालिकेसाठी तयार केलेल्या ग्राफिक्स पोस्टरवर धवनचाच चेहरा लावला गेला असल्याने संघाच्या कर्णधारपदी त्याचीच नियुक्ती होणार असेच दिसत आहे.