नवी दिल्ली, दि. 18- देशातील उदभवलेली करोनाची दुसरी लाट आणि त्या लाटेने धारण केलेले रौद्र रूप यामुळे भारतात सगळीकडून लसींच्या पुरवठ्याची मागणी होत आहे. लसी दिल्या गेल्या तरच करोनावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते, असे तज्ज्ञांनीही म्हटले आहे. मात्र जेव्हा गरज आहे तेव्हा लसी उपलब्ध नसल्यामुळे भारताने अन्य देशांना मदत म्हणून किंवा विक्री म्हणून केला जाणारा लस पुरवठा पूर्णपणे थांबवला असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने वृत्तसंस्थेने दिली आहे.
दुसऱ्या लाटेचे जबर आव्हान भारतासमोर उभे राहिले आहे. देशात लसींचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे अंतर्गत वाद सुरू झाले आहे. विरोधी पक्षांनी याच विषयावरून सरकारला धारेवर धरल्यामुळे महिनाभरापासून परदेशात लसी पाठवण्याचे बंद करण्यात आले आहे.
भारताने आतापर्यंत साडेसहा कोटी डोस परदेशात दिले असल्याची अधिकृत माहिती आहे. मात्र आता अगोदर आपली गरज भागवणार, किमान दुसरी लाट आटोक्यात येत नाही तापेर्यंत परदेशात लस पाठवणार नसल्याचा निर्णय घेतला गेला असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
याबाबत कोणत्याही देशाला अधिकृतपणे काही कळवण्यात आले आहे, का याबाबत ते म्हणाले की भारतातील सध्याच्या स्थितीच्या अनुशंगाने आम्हाला पुरवठा करणे सध्या तरी शक्य नसल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र कोणत्या देशांना असे कळवले आहे ते त्यांनी सांगण्यास नकार दिला. दरम्यान, याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
भारताने नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका आणि आफ्रिकेतील काही देशांना आतापर्यंत मदत केली आहे. आता भारतातून येणारा पुरवठा थांबल्यामुळे या देशांना पर्याय शोधावा लागणार आहे.
लसीची निर्यात पुन्हा नक्की केव्हा सुरू होईल याबाबत त्या सूत्रांनी काही सांगितले नाही. मात्र भारतातील दुसरी लाट पूर्ण आटोक्यात आल्यावरच याबाबत विचार केला जाऊ शकतो. अर्थात त्याकरता ऑक्टोबरही उजाडू शकतो असे संकेत त्यांनी दिले.
दरम्यान, करोना विरोधातील लढ्याचा एक भाग म्हणून भारताने अर्थात भारतात लस तयार करणाऱ्या सीरमकडून जगातील अन्य देशांसाठी मे महिन्याच्या अखेरपर्यंत 14 कोटी डोस उपलब्ध करून दिले जाणे अपेक्षित होते. पण आता हे डोस भारतातच वापरले जाणार आहेत.