नवी दिल्ली – मोदी सरकार अलिकडे जे विचीत्र स्वरूपाचे निर्णय घेत आहे त्यामुळे देश दिवाळखोरीकडे जाताना दिसत असून भारताचीही श्रीलंकेसारखी स्थिती होण्याची शक्यता आहे अशी टीका कॉंग्रेसचे नेते मल्लिकार्जून खरगे यांनी केली आहे.
खरगे म्हणाले की देशभरात महागाई सातत्याने वाढत आहे आणि सरकार सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची विक्री करत आहे,ही स्थिती भीषण आहे. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी अन्य देशांतील इंधनाच्या दराची तुलना करून भारतातील इंधनाचे दरवाढ कमीच असल्याचे म्हटले आहे.
त्यावर खरगे म्हणाले, भारताची इतर देशांशी तुलना करणे योग्य नाही. विकसित देशांतील लोकांच्या उत्पन्नात आणि आपल्या देशातील लोकांच्या उत्पन्नात मोठी तफावत आहे. यूपीए सरकारच्या कालखंडाचा संदर्भ देत खरगे म्हणाले, आमच्या सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जास्त असतानाही यूपीए सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती नियंत्रित करून जनतेला दिलासा दिला होता.
कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही ट्विट केले आहे की, “येत्या किती दिवसात भारताची स्थिती श्रीलंकेसारखी होईल याचा अजून अंदाज येत नाही. परंतु या स्थितीची गांभीर्याने चर्चा करण्याऐवजी हिंदू धर्म धोक्यात आहे म्हणून चिंता उपस्थित केली जात आहे. श्रीलंकेने त्यांच्या जीडीपीच्या 95 टक्के कर्ज घेतले आहे आणि पंतप्रधान मोदींनी 83 टक्के कर्ज घेतले आहे. श्रीलंकेतील स्थितीच्या तुलनेत आज आम्ही फक्त 13 पावले दूर आहोत याचा हवालाही दिग्जिजयसिंह यांनी दिला आहे.