नवी दिल्ली – गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये सुमारे दोन लाख उमेदवारांची भरती करण्यात आली आहे, अशी माहिती कार्मिक विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आज संसदेत दिली.
गेल्या पाच वर्षांत, कर्मचारी निवड आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यांनी अनुक्रमे 1,85,734 आणि 27,764 पदांची जाहिरात जारी केली आणि प्रत्यक्षात अनुक्रमे 1,74,744 आणि 24,836 उमेदवारांची भरती केली आहे, असे ते म्हणाले.
रोजगार निर्मितीला सरकारचे प्राधान्य असून त्यासाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत, ज्यात पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, गरीब कल्याण रोजगार अभियान, रोजगार भरती योजना यांचा समावेश आहे.
याखेरीज पं. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना आणि दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान इत्यादी उपक्रम देशात सुरू आहेत, असे मंत्र्यांनी सांगितले.