India-Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दलच्या मालदीवच्या नेत्यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावरून मालदीव आणि भारत यांच्यातील संबंध तणावाचे निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने आज मालदीवचे उच्चायुक्त इब्राहिम साहिब यांना या सर्व मुद्दयावर चर्चेसाठी निमंत्रित केले होते. त्यानंतर इब्राहिम शाहिब दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या सदर्न ब्लॉकमध्ये पोहोचले. यावेळी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या वादावर चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे अजून समोर आले नाही.
दरम्यान, रविवारी मालदीव सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या तीन मंत्र्यांना निलंबित केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याबाबत या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींवर अपमानास्पद वक्तव्य केले होते. या टिप्पण्यांबाबत भारतीय उच्चायुक्तांनी मालदीव सरकारकडे आक्षेप नोंदवला होता.
पंतप्रधान मोदींनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली होती. यादरम्यान पीएम मोदींनी लक्षद्वीपची सुंदर छायाचित्रे शेअर केली होती आणि भारतीयांना त्यांच्या पर्यटन स्थळांच्या यादीत या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश करण्याचे आवाहन केले होते. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी दावा केला होता की, मालदीवसाठी हा धक्का असेल.
#WATCH | Ibrahim Shaheeb, Maldives Envoy exits the MEA in Delhi’s South Block.
He had reached the Ministry amid row over Maldives MP’s post on PM Modi’s visit to Lakshadweep. pic.twitter.com/Dxsj3nkNvw
— ANI (@ANI) January 8, 2024
सोशल मीडियावर भारतीयांच्या या दाव्यामुळे संतप्त झालेल्या मालदीवच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर पीएम मोदींच्या दौऱ्याची खिल्ली उडवली होती आणि त्यांच्यावर अपमानास्पद टीका केली होती. यानंतर #BoycottMaldives सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. अनेक बड्या व्यक्ती आणि युझर्सनी दावा केला की त्यांनी मालदीवचा दौरा रद्द केला आहे.
लक्षद्वीप भेटीवर पंतप्रधान मोदींच्या टिप्पण्यांवर प्रतिक्रिया देताना, मालदीव सरकारने रविवारी त्यांचे तीन मंत्री मलशा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम मजीद यांना निलंबित केले. एवढेच नाही तर मालदीव सरकारने मंत्र्यांचे वक्तव्य वैयक्तिक असल्याचे सांगत स्वतःला दुर ठेवले आहे.
भारत आणि पंतप्रधान मोदींविरोधात वक्तव्ये केल्यानंतर हे नेते त्यांच्याच घरात बंदिस्त झाले आहेत. मालदीवच्या इतर नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी मालदीवच्या सरकारी अधिकाऱ्यांच्या भारताविरोधातील वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले की, मी सोशल मीडियावर मालदीवच्या सरकारी अधिकाऱ्यांकडून भारताविरोधात द्वेषपूर्ण भाषेच्या वापराचा निषेध करतो. भारत हा मालदीवचा नेहमीच चांगला मित्र राहिला आहे आणि अशा अपमानास्पद टिप्पण्यांमुळे आमच्या दोन्ही देशांमधील जुन्या मैत्रीवर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नये.” असे म्हटले होते.