आय एम एफच्या प्रमुखांचे मत
वॉशिंग्टन – भारतातील अर्थव्यवस्थेत घसरण झाली हे खरे असले तरी भारतात मंदी आली आहे, यात काहीच तथ्य नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेत लवकरच सुधारणा होईल, असे वक्तव्य आंतरराष्ट्रीय मुद्राकोष (आयएमएफ) च्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिया यांनी भारत सरकारच्या वार्षिक अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केल्याने केंद्रातील मोदी सरकारला दिलासा मिळाला असल्याचे मानले जात आहे. जॉर्जिया यांनी आंतरराष्ट्रीय पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अर्थविषयक माहिती देताना सांगितले की, भारताचा वर्ष 2020 मध्ये 5.8 टक्के (विकास दर) आणि नंतर वर्ष 2021 मध्ये 6.5 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
वर्ष 2019 मध्ये आर्थिक सुधारणांसाठी करण्यात आलेल्या जीएसटी आणि नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचे जॉर्जिया यांनी सांगितले. भारतात सध्या जी आर्थिक व्यवस्था दिसत आहे, ती आर्थिक मंदी आहे, असे म्हणता येणार नाही, असे त्या म्हणाल्या. भारतातील आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी मोठे पाऊल उचलले जात आहे. परंतु, याचे परिणाम दीर्घ काळासाठी असणार आहेत. मोदी सरकार जी पावलं उचलत आहेत, त्याचे तात्काळ परिणाम होईल असे नाही. भारतीय अर्थव्यवस्थेने वास्तविक 2019 मध्ये अचानक पणे मंदी अनुभवली.