नवी दिल्ली: भारतात अद्याप करोनाचा सामुदायिक संसर्ग झालेला नाही, असे आज केंद्र सरकारने स्पष्ट केले. करोनाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये गेल्या आठवड्यात अचानक मोठी वाढ झाल्यामुळे मुंबई आणि दिल्लीमध्ये सामुदायिक संसर्गाची भीती वर्तवली जाऊ लागली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे स्पष्टीकरण दिले आहे.
“भारत हा खूप मोठा देश आहे. त्या तुलनेत झालेला प्रादुर्भाव कमी आहे. देशात सामुदायिक संसर्ग झालेला नाही.’ असे “इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले. करोनाचा वेगाने होत असलेला प्रादुर्भाव मर्यादित राखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय यशस्वी झाला असल्याचेही भार्गव यांनी सांगितले.
देशातील 15 जिल्ह्यांमधील 0.73 टक्के लोकसंख्येला करोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. याचा अर्थ लॉकडाऊनच्या उपाययोजनेमुळेच हा प्रादुर्भाव नियंत्रणात राहू शकला आहे, असे भार्गव म्हणाले.
दिल्लीमध्ये सामुदायिक संसर्गाची लक्षणे दिसल्याचा पुनरुच्चार दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन बुधवारी केला होता. मात्र सामुदायिक संसर्ग झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर करायला पाहिजे, असेही ते म्हणाले होते. दिल्लीत फैलावलेल्या करोनाच्या संसर्गापैकी 50 टक्के प्रकरणांमध्ये संसर्गाचे मूळ शोधून काढणे आपल्या सरकारला शक्य नसल्याचेही त्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाबरोबर बैठक घेतल्यानंतर सांगितले होते.
दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर इतर देशांमधून प्रवासी येण्यास परवानगी दिली गेली आहे. दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरात इतर देशांमधील प्रवासी येऊ लागल्यानेच तेथील रुग्णांची संख्या वाढली आहे. याबाबत केंद्र सरकारला सतर्क केले गेले होते. मात्र तरीही केंद्राने या संदर्भात काहीही केले नाही, अशी टीकाही जैन यांनी केली.