नवी दिल्ली – भारतातील करोनाबाधितांच्या संख्येने गुरुवारी 6 लाखांचा टप्पा ओलांडला. देशाने 5 लाखांचा टप्पा पार केल्यानंतर नवा टप्पा गाठण्यास अवघे 5 दिवस लागले. दरम्यान, देशातील करोनाबळींची संख्या 18 हजारांवर पोहोचली आहे.
देशात बुधवार सकाळपासून 24 तासांत नवे 19 हजार 148 बाधित आढळले. त्यामुळे देशात सलग 6 व्या दिवशी 18 हजारांहून अधिक बाधितांची भर पडली. त्यामुळे बाधित संख्येने वेगाने नवा टप्पा गाठला. देशातील करोनाबाधितांची संख्या 1 लाखवर पोहोचण्यास 110 दिवसांचा कालावधी लागला होता. मात्र, पुढील 5 लाख बाधित अवघ्या 44 दिवसांत आढळले. देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. त्यापाठोपाठ तमिळनाडूतील बाधितांची संख्या 1 लाखाचा टप्पा गाठण्याच्या स्थितीत आहे. दिल्लीत 90 हजारांहून अधिक बाधित आढळले आहेत. गुजरातमध्ये 33 हजारांहून अधिक बाधितांची नोंद झाली आहे.
देशात बुधवारी उच्चांकी 507 करोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी मृतांच्या संख्येत 434 ची भर पडली. महाराष्ट्रात 8 हजारांहून अधिक बाधित दगावले आहेत. त्यापाठोपाठ दिल्लीत 2 हजार 800 हून अधिक बाधित मृत्युमुखी पडले आहेत.
गुजरातमधील करोनाबळींची संख्या 1 हजार 900 च्या घरात पोहोचली आहे. करोना संकटातही बाधित बरे होण्याचे प्रमाण देशासाठी आशादायी ठरत आहे. देशात सध्या सुमारे 2 लाख 27 हजार सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत जवळपास 3 लाख 60 हजार बाधित करोनामुक्त झाले आहेत. करोना रुग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण 59.52 टक्के इतके आहे. देशातील करोनाविषयक चाचण्यांचा वेगही आता वाढला आहे. आतापर्यंत 90 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.