वॉशिंग्टन: रशिया आणि युक्रेनदरम्यानचे युद्ध चीन नव्हे तर भारत थांबवू शकतो, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता करार व्हावा यासाठी चीन जोराने प्रयत्न करत आहे. भारताचे रशियाशी जुने संबंध आहेत, अशा परिस्थितीत भारताने पुतीन यांच्याशी चर्चा करून युक्रेन युद्धावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत भारतीय-अमेरिकन कॉंग्रेसचे सदस्य ऍमी बेरा यांनी व्यक्त केले.
बेरा म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्यात त्यांची आणि राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात युक्रेनच्या संकटावर काही चर्चा होईल की नाही, हे मला माहीत नाही. पण मोदींनीच याबाबतीत पुढाकार घ्यावा, असेही बेरा म्हणाले.
ऍमी बेरा म्हणाले की, भारतीय पंतप्रधान या विषयावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलू शकतात; कारण आम्ही तसे करू शकत नाही. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग युद्धविरामासाठी दोन्ही बाजूंनी सहमती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण मला वाटते की, हे काम भारताने केले पाहिजे.
ऍमी बेरी म्हणाले की, पुढील आठवड्यात मोदी आणि बायडेन यांच्यात होणाऱ्या बैठकीत आर्थिक भागीदारीवर चर्चा होऊ शकते. दोन्ही देशांमध्ये व्यापार, पुरवठा साखळी यावर चर्चा होऊ शकते. भारत हा कच्च्या मालाचा प्रमुख पुरवठादार आहे. अशा परिस्थितीत फार्मास्युटिकल क्षेत्र आणि तंत्रज्ञान या विषयावर चर्चा होऊ शकते. यासोबतच भू-राजकीय सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य यावरही चर्चा होणार आहे.