दुबई – जागतिक क्रिकेटमधील परंपरागत प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची मेजवानी लवकरच क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळणार आहे. आयसीसीने यंदा होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची गटवारी जाहीर केली असून त्यात हे दोन संघ एकाच गटात आहेत.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच गटात असून सुपर-1 मधील गट-2 मध्ये चाहत्यांना त्यांची चुरस पाहायला मिळणार आहे. 2019 सालच्या एकदिवसीय विश्वकरंडक
स्पर्धेत या दोन संघांत अखेरचा सामना झाला होता.
विश्वकरंडक स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करण्याची परंपरा भारतीय संघाने त्यावेळीही पूर्ण केली होती. आता यंदा पुन्हा भारताला विश्वकरंडक स्पर्धेतून सुप्रिमसी सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
करोनाच्या धोक्यामुळे भारतात होणारी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आता येत्या 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत अमिराती व ओमानमध्ये खेळवली जाणार आहे. शुक्रवारी ओमानमध्ये झालेल्या बैठकीत आयसीसीच्या अधिकाऱ्यांसह बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा हेदेखील उपस्थित होते. या स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
ओमान आणि अमिरातीत होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पात्र आठ संघ सहभागी होणार आहेत. यातील चार संघ सुपर-12 फेरीत पात्र होतील. प्राथमिक फेरीतील आठ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलॅंड, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 14 नोव्हेंबरला होणार आहे. 2016 सालानंतरची ही पहिलीच टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आहे.