पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांतील कंत्राटी कामगारांच्या कंत्राटदाराकडून आर्थिक पिळवणूक होत आहे, असा आरोप करत ती थांबवावी. कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा, कामगारांच्या वेतनात वाढ करावी, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे राज्यातील सुमारे 42 हजार वीज कंत्राटी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे.
रास्ता पेठ येथील विद्युत पारेषण वितरण कंपनी समोर आंदोलन करून संप पुकारण्यात आला. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे लक्ष द्यावे. त्यांच्या विविध मागण्यांची दखल घेऊन त्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा कृती समिती पदाधिकारी नीलेश खरात आणि कामगारांनी व्यक्त केली.
राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये सुमारे 42 हजार कंत्राटी कामगार रात्रीपासून हे आंदोलनात सामील झाले आहेत. प्रशासन या मागण्यांकडे कानाडोळा करत असेल, तर हे आंदोलन सुरूच राहणार आहे. या संपात ९५ टक्क्यांपेक्षा जास्त कंत्राटी कामगार सहभागी झाले होते, अशी माहिती कृती समितीचे सचिन मेंगाळे यांनी दिली.