IND vs NZ T20 – टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात शुक्रवारी ३ सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना रांची येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला २१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाहुणा संघ सध्या या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून फिरकी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली मात्र वेगवान गोलंदाजांकडून मोठया प्रमाणात धावा खर्च झाल्या. त्यातच कर्णधार हार्दिक पंड्याने ज्या पद्धतीने आपल्या गोलंदाजांचा वापर केला, त्यावरूनही प्रश्न उपस्थतीत केले जात आहेत.
सामन्याच्या दोन्ही डावात फिरकी गोलंदाज फलंदाजांवर वर्चस्व मिळवताना दिसले. त्यामुळे हार्दिक पंड्याने संघातील गोलंदाजांचा योग्य वापर न केल्याने पाहुण्या संघाला मोठ्या धावसंख्येचा आकडा भारतासमोर उभा करता आला. महत्वाचं म्हणजे वेगवान गोलंदाज शिवम मावी आणि उमरान मलिक यांना दोघांनाही सामन्यात खेळवण्यात आले. मात्र, उमरानला एक तर मावीला दोनच षटके टाकण्याची संधी दिली. दोघांनी मिळून फक्त तीन षटके गोलंदाजी केली. त्याजागी जर एक फलंदाज अतिरिक्त खेळवला असता तर संघाला त्याचा फायदाच झालाअसता.
दुसरीकडे, पावरप्लेमध्ये गोलंदाजीत चांगल्याप्रकारे विविधता आणि यश मिळवून देऊ शकणाऱ्या शिवम मावीला गोलंदाजी न देता हार्दिकने स्वतः डावाची सुरुवात केली. हार्दिकने या सामन्यात ३ षटके गोलंदाजी केली आणि ३३ धावा खर्च केल्या. त्याचबरोबर खेळपट्टी चांगल्याप्रकारे फिरकी गोलंदाजांना साथ देत असताना दीपक हुडाला दोनच षटके गोलंदाजी करण्याची संधी दिली. तसे पहिले तर हार्दिककडे सामन्यात गोलंदाजीमध्ये सात पर्याय होते.
हार्दिक पंड्या या सामन्यात वैयक्तिक काही खास कामगिरी करू शकला नाही. त्याने गोलंदाजीत ३ षटकात ३३ धावा खर्च केल्या आणि फलंदाजीत २० चेंडूत २१ धावा केल्या. याच कारणांमुळे हार्दिकच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थतीत केले जात आहेत. मालिकेतील दुसरा सामना २९ जानेवारीला (रविवार) खेळला जाणार आहे. तर १ फेब्रुवारीला मालिकेतील तिसरा सामना खेळला जाईल.