चंदीगड – एकीकडे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीमच्या पॅरोलविरोधात उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे बाबा राम रहीम यूपीमधील आश्रमात बसून पंजाबमध्ये सत्संग करण्याची तयारी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डेरा प्रमुख यूपीमधील बर्नवा आश्रमातून भटिंडा येथील डेरा सलाबतपुरा येथे अनुयायांशी ऑनलाइन संपर्क साधून त्यांना प्रवचन देणार आहे. 29 जानेवारीला सत्संग घेण्यास प्रशासनाने परवानगीही दिली आहे. राम रहीमच्या या कार्यक्रमावरून पंजाबचे राजकारणही चांगलेच तापले असून त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होत आहे.
40 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आल्यानंतर राम रहीम चर्चेत आले असून काँग्रेसनेही त्यांच्या पंजाबमधील कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारने कर्फ्यू लावून ऑनलाइन सत्संग थांबवावा. ते म्हणाले की, राम रहीम पंजाबचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असून सरकारने हे समजून घेतले पाहिजे.
डेरा सच्चा सौदाच्या प्रमुखाला संरक्षण देण्यासाठी हरियाणा सरकारविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णयही एसजीपीसीने घेतला आहे. एसजीपीसीचे अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी म्हणाले की, राम रहीमने पॅरोलचा आनंद साजरा करण्यासाठी किरपानने केक कापून शिखांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. किरपान हे शीख धर्माच्या श्रद्धेशी संबंधित प्रतीक मानले जाते आणि त्याचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही.
शिरोमणी अकाली दलाने (एसएडी) राम रहीमला दिलेल्या पॅरोल सुविधेच्या गैरवापराचा निषेध केला आहे. एसएडीचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल म्हणाले की, राम रहीमविरुद्धचे गुन्हेगारी खटले अद्याप प्रलंबित आहेत, परंतु हरियाणा सरकार त्याला व्हीव्हीआयपी मानत असून पूर्ण पाठिंबा देत आहे. पंजाबी भाषेत लिहिलेल्या ट्विटमध्ये बादल यांनी पॅरोलवर सुटल्यानंतर राम रहीम तलवारीने केक कापताना दाखविलेल्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, “शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्यासाठी काही शिल्लक राहिले आहे का?”
दरम्यान, राम रहीम बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात शिक्षा भोगत आहे. सध्या तो 40 दिवसांच्या पॅरोलवर जेलमधून बाहेर आला आहे. बाहेर येताच पॅरोलचा आनंद साजरा करण्यासाठी त्याने तलवारीने केक कापला होता. त्यामुळे तो चर्चेत असतानाचा आता त्याच्या ऑनलाइन सत्संगावरून पंजाबमधील राजकीय वातावरण तापले आहे. हरियाणा सरकार राम रहीमला एका व्हीव्हीआयपीसारखे वागवत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.