अशोक चव्हाण : रस्ते, उड्डाणपूल उभारणीबाबत व्यापक धोरणात्मक कार्यक्रम हाती घेणार
पुणे – पुणे-मुंबई महामार्गाप्रमाणे राज्यातील मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर सुविधा देण्याबरोबरच वाढते नागरिकीकरण व सुलभ वाहतूक यांचा समन्वय साधला जाणार आहे. रस्ते, उड्डाणपूल उभारणीबाबत पुढील 15 ते 20 वर्षांचे नियोजन व्यापक धोरणात्मक कार्यक्रम हाती घेणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पाषाण येथील पोलीस संशोधन केंद्राच्या सभागृहात आयोजित केलेल्या पहिल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंता परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी चव्हाण बोलत होते. यावेळी विभागाचे सचिव (रस्ते) सी. पी. जोशी, सचिव (बांधकाम) अजित सगणे, पुणे विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळूंखे आदी उपस्थित होते.
प्रलंबित राष्ट्रीय महामार्गांची कामे तसेच कोर्ट कचेऱ्यांमुळे रखडलेल्या कामांचा आढावा घेऊन ही कामे मार्गी लावण्यासाठी निर्णय घेत असल्याचे सांगून चव्हाण म्हणाले, वित्तीय संस्था, बॅंका यांच्या माध्यमातून अधिक पत निर्माण करून निधी उपलब्ध करणे, अर्थसंकल्प, नाबार्डकडून विभागाला अधिकाधिक निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अधिक दर्जेदार, टिकाऊ रस्ते बांधणीसाठी ध्येय, गुणवत्ता आणि सातत्य या त्रिसुत्रीवर आधारित कामे करण्यावर बांधकाम विभाग भर देणार आहे. नागरिकांची गरज लक्षात घेता मुंबई-पुणे महामार्गाप्रमाणे सोयीसुविधांबरोबरच ट्रक टर्मिनल, महामार्ग सुशोभिकरण, देखभाल-दुरुस्तीवर अधिक भर देण्यात येईल.
कामांची गुणवत्ता व दर्जा राखण्यासाठी विभागाची कार्य संस्कृती निर्माण करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांची वेळेत, प्रभावी व टिकाऊ अंमलबजावणीसाठी आर्किटेक्चर विभाग, गार्डन विभाग, यांत्रिकी विभाग आणि गुणवत्ता नियंत्रण विभाग यांचा समन्वय राखण्याच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या.
रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्राधान्य
बांधकाम करताना रेन वॉटर हार्वेस्टिंग व कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. अशा प्रकारच्या परिषदांमुळे राज्यातील अभियंत्यांमध्ये तंत्र व कार्यपद्धती यांचे आदान प्रदान होवून कामकाजामध्ये सुसंवाद, पारदर्शकता, गतीमानता, प्रशासकीय सुधारणा होण्यास मदत होईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.