पुणे – राज्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे इयत्ता अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाही पुढे ढकलण्यात येणार आहे. त्यात यंदा नवीन एजन्सी मार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
राज्यातील विविध ठिकाणी करोनाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे गेल्या महिन्यापासून शाळा व महाविद्यालय बंद ठेवण्यात आले आहेत. लॉकडाऊनचा कालावधीही वाढतच आहे. दहावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणी व सबमिशनच्या कामकाजातही मोठी अडचण निर्माण झाली आहे. याचा फटका निश्चितच अकरावीच्या प्रवेशाला बसणार आहे.
राज्यात पुणे, मुबंई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या महापालिका हद्दीत अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाईन पध्दत राबविण्यात येते. उर्वरित भागात ऑफलाईन द्वारे प्रवेश देण्यात येतात. गेल्या वर्षी ८ जूनला दहावीचा निकाल जाहीर झाला होता. अकरावी प्रवेश अर्जाचा भाग -१ भरण्यासाठीची ऑनलाईन सुविधा २७ मे पासून उपलब्ध करुन देण्यात आली होती. १८ जूनला प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. सप्टेंबर पर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरुच ठेवण्यात आली होती.
प्रवेशाच्या एकूण सात फेऱ्या घेण्यात आल्या होत्या तरीही बहुसंख्य महाविद्यालयातील प्रवेशाच्या जागा रिक्तच राहिल्या होत्या. मागील तीन वर्षांपासून अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे कामकाज ‘नायसा’ या कंपन्या मार्फत करण्यात आले. मात्र या कंपनीच्या कामकाजाबाबत शिक्षण विभागातील अधिकारी, पालक, विविध संघटना यांनी अनेकदा नाराजी व्यक्त करत तक्रारी दाखल केल्या होत्या.
प्रवेश प्रक्रियेचा अहवालही त्यांनी कधीच वेळेत दाखल केला नव्हता. त्यामुळे या कंपनीवर लाखो रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रवेशासाठी जून्या कंपनीला बाजूला करत नवीन कंपनीची नियुक्ती केली आहे.
राज्यमंडळांच्या शाळांच्या दहावीच्या निकालाबरोबरच सीबीएसई, सीआयएसई,आयजीसीएसई, आयबी, एन आयओएस मंडळाच्या परीक्षाचे निकाल कधी लागतात यावर अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अवलंबून असणार आहे. प्रवेश प्रक्रियेच्या वेळी कोठेही विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांची गर्दी होणार नाही याची खबरदारीही बाळगावी लागणार आहे.
इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा ‘तलीष्मा’ या एजन्सीला काम देण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी पोर्टल विकसित करण्यात येणार त्याचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी संभाव्य वेळापत्रकही तयार करुन ठेवण्यात येणार आहे. मात्र दहावीच्या निकालाच्या तारखेचा विचार करुन वेळापत्रक अंतिम करावे लागणार आहे. लॉकडाऊन उठल्यानंतरच प्रत्यक्षात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेत एकसूत्रता, पारदर्शकता आणण्यासाठी योग्य ते नियोजन करुन त्याची अंमलबजावणी करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे.