बंगळुरू – चीन सीमेवर सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली असून तेथील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताने अंतरिक्ष निरीक्षण क्षमता वाढवली पाहिजे अशी अपेक्षा इस्त्रोचे माजी अध्यक्ष जी माधवन नायर यांनी व्यक्त केली आहे. बदलत्या काळानुसार अंतरिक्षातून निरीक्षणासाठीची सुविधा वाढवली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सुरक्षा संबंधित बाबींमध्ये अंतरीक्ष निरीक्षण, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स इंटेलिजन्स याही महत्त्वाच्या बाबींचा समावेश होतो. त्या बाबींचे महत्व खूप अधिक आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. माझ्या माहितीनुसार चिनी बाजूकडे अनेक प्रकारचे रडार इमेजिंग उपग्रह आहेत.
पृथ्वीचे बारकाईने निरीक्षण करू शकण्याची क्षमता असलेले उपग्रहही आहेत. आणि त्यांची उपग्रह दळणवळण संपर्क यंत्रणाहीं भारतापेक्षा खूपच अधिक आहे. ते केवळ भारतीय हद्दीवरच नव्हे तर संपूर्ण जगातील हालचालींवर नियंत्रण व निरीक्षण करू शकतात असे नायर यांनी नमूद केले. त्यामुळे उपग्रहाद्वारे त्यांना सध्या हवी ती माहिती ते (चीन) मिळवू शकतात.
भारताला जगाचे निरीक्षण करता आले नाहीं तर निदान त्यांनी सीमावर्ती भागात तरी अंतरिक्षातून निरीक्षण करण्याची क्षमता प्राप्त करायला हवी. भारत आज विविध क्षेत्राला उपयोगी पडू शकतील, असे उपग्रह अंतरिक्षात प्रक्षेपित करू शकतो. त्यामुळे भारताच्या या शक्तीचा वापर करून ही निरीक्षण क्षमता वाढवण्याची तातडीची गरज आहे असे नायर यांनी यावेळी नमूद केले.
यासाठी उपग्रहांची संख्या वाढवणे, अंतरिक्षात अर्थ स्टेशन उभारणे अशा गोष्टी करण्यावर भारताने आता लक्ष केंद्रित केले पाहिजे. भविष्यातील युद्धासाठी तुमची अंतरिक्षातील क्षमता महत्त्वाची ठरणार आहे ही बाब ध्यानात घेण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली.