नवी दिल्ली – भारत सरकारने चीन सीमेवरील पायाभूत सुविधांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे आणि त्यातून तेथे अशी कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे. आज पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, चुशुल-दुंगती-फुकचे-देमचोक या 135 किमी रस्त्याचे काम सुरू झाले असून हा रस्ता व्युहात्मकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. चीन सीमेवरील 16 पासेस लष्करी जवानांच्या हालचालीसाठी फार महत्वाच्या आहेत हे रस्तेही खुले करण्यात आले आहेत.
ते म्हणाले की सन 2014 ते 2022 या कालावधीत सरकारने चीन सीमेवर 6806 किमीचे रस्ते बांधले आहेत. सन 2008 ते 2014 या अवधीत तेथे केवळ 3610 किमीचे रस्ते बांधले गेले होते. त्याच प्रमाणे आम्ही सन 2014 ते 2022 या अवधीत 22,439 मिटर लांबीचे पुल उभारले असून 2008 ते 2014 या अवधीत केवळ 7270 मीटर लांबीचेच पुल चीन सीमेवर बांधले गेले होते. चीन सीमेवर अशा पायाभूत सुविधा उभारण्याची गरज लक्षात घेऊन सरकारने तेथे आपले लक्ष पुरवले आहे असे ते म्हणाले.
शेजारील देशांशी आम्हीं बॉर्डर कनेक्टीव्हीटीही वाढवली आहे त्यातून व्यापारालाही चालना मिळते आणि शेजारील देशांच्या आपसातील लोकसंपर्कालाही चालना मिळते असे ते म्हणाले. 13700 फूट उंचीवरील बारीपारा-चरदौर-तवांग रस्त्यावर सेला बोगदा उभारण्यात येत आहे. त्यामुळे तवांग जवळ प्रत्यक्ष ताबा रेषवर भारतील लष्करासाठी सर्व श्रृतूत परिवहन सेवा उपलब्ध होऊ शकणार आहे. तेथील दोन बोगदे उभरण्याचे काम पुर्ण झाल्यावर हा रस्ता लष्कराच्या वापराला खुला होईल. दुर्गम आणि अति उंचीवरील ठिकाणांच्या रस्ते व बोगदे उभारणीसाठी उच्च तंत्रज्ञानाचाही वापर केला जात आहे असे त्यांनी सांगितले.