नवी दिल्ली – भारत-चीन सीमेवरील 100 गावे विकसीत करण्याचा प्रस्ताव उत्तराखंड सरकारने केंद्राला सादर केला आहे. त्यामुळे त्या भागात रोजगार निर्मिती होऊन स्थलांतर थांबेल, असे राज्याचे कृषीमंत्री सुबोध उनियाल यांनी सांगितले.
सीमावर्ती भागातील 11 ब्लॉकमध्ये राज्य सरकारने ही गावे निवडली आहेत. या 11 ब्लॉकमध्ये चार पिठोरगढ, एक चामोली, तीन उत्तरकाशी, एक उधम सिंग नगर आणि दोन चंपावत जिल्ह्यात आहेत. ही गावे आदर्श गाव म्हणून विकसित करण्याची योजना आहे.
आंतरराष्ट्रीय सीमा विकास कार्यक्रमानुसार आम्ही केंद्र सरकारकडे एकात्मिक कृषी विकास मॉडेलचा प्रस्ताव पाठवला आहे. रोजगार निर्मिती हा त्याचा मुख्य उद्देश आहे, असे उनीयाल यांनी स्पष्ट केले.
शेतीला चालना, सीमावर्ती भागात हॉर्टीकल्चर यांना प्राधान्य देण्यात येईल. याशिवाय मासेमारी, दूध प्रकल्प, मधमाशी पालन असे प्रकल्प राबवून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा यातून प्रयत्न करण्यात येईल. या प्रस्तावानुसार गावापासून एक ते दहा किमीच्या त्रिज्येचा परिसर विकसित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.