औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील 1368 गावांपैकी 341 गावांत करोनाची लागण झाली होती, पण आता त्यातील 206 खेडी पूर्णपणे करोनामुक्त झाली आहेत, अशी माहिती आज अधिकृत सूत्रांनी दिली.
या संबंधात माहिती देताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवले यांनी सांगितले की, बाधित क्षेत्राचे करण्यात आलेले सूक्ष्म मॉनिटरिंग, गावातील वृद्धांची सातत्याने करण्यात आलेली तपासणी अशा उपायांमुळे ही गावे करोनामुक्त होऊ शकली आहेत.
या करोनामुक्त गावांपैकी 67 गावांमध्ये गेल्या 28 दिवसांत एकही करोना पेशंट आढळून आलेला नाही. 63 गावांमध्ये गेल्या चौदा दिवसांत तर एकही पेशंट आढळून आलेला नाही. आज शुक्रवारच्या रिपोर्टनुसार आणखी 76 गावांमध्येही करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. अशा तऱ्हेने जिल्ह्यातीाल 206 खेडी करोनामुक्त झाली आहेत.
गोंदवले यांनी सांगितले की करोना चाचण्यांच्या किट्सचा आम्हाला मोठ्या प्रमाणात तेथे अभाव आढळला. आम्ही 30 हजार ऍन्टिजेन किट्सची मागणी केली आहे. तथापि नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने आम्ही तेथे याची व्यवस्था सध्या केली आहे.