कॅशलेस व्यवहार : एकट्या डिसेंबरमध्ये 103 कोटी व्यवहारांची नोंद
पुणे – केंद्र सरकारने डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी प्रयत्न चालूच ठेवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजे यूपीआय ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेवरून होणाऱ्या व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.
नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीत म्हटले आहे, डिसेंबरमध्ये यूपीआयच्या माध्यमातून 103 कोटी व्यवहारांची नोंद झाली. ऑक्टोबरपेक्षा नोव्हेंबरमध्ये झालेल्या व्यवहारांमध्ये सात टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, डिसेंबर 2018 च्या तुलनेत 2019 डिसेंबरमध्ये 111 टक्क्यांची वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये यूपीआयच्या माध्यमातून 1.89 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले होते. डिसेंबरमध्ये त्यात वाढ होऊन या महिन्यांमध्ये 2.02 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
यूपीआयच्या माध्यमातून ग्राहकांना कधीही तत्काळ पैसे बॅंकातील विविध खात्यातून पाठवता येतात. यामध्ये ज्यांना पैसे पाठवायचे आहेत, त्यांच्या बॅंक खात्याचा तपशील देण्याची गरज पडत नाही. तीन वर्षांपासून सुरू केलेली ही योजना दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत चालली आहे. यामध्ये उत्तरोत्तर सुधारणा करण्यात येत आहेत. त्याचबरोबर ही योजना लोकप्रिय व्हावी, यासाठी सरकार विविध माध्यमातून चालना देत आहे.
कंपन्यांनाही दिल्या सूचना
50 कोटी रुपयांवरील उलाढाल असलेल्या कंपन्यांना 1 जानेवारीपासून आपले व्यवहार रूपे आणि यूपीआयच्या माध्यमातून करण्यास सांगितले आहे. यासाठी या कंपन्यांनी आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करावी, याकरिता दि.1 फेब्रुवारीपर्यंत कालावधी देण्यात आलेला आहे. जर फेब्रुवारीनंतर या कंपन्यांनी डिजिटल व्यवहारासाठी आवश्यक यंत्रणा उभारली, तर त्यांना दंड करण्यात येणार आहे. मात्र त्यांनी डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून पैसे पाठवल्यानंतर त्यांना एमडीआर शुल्क लागणार नाही.