सातारा – महाविकास आघाडीच्या नेत्यांना सत्ता गेल्याचे दुःख आहे. त्यांचे आमदार राज्याच्या आतिथ्यशील संस्कृतीला काळीमा फासत आहेत. ना त्यांना राज्याशी देणे घेणे आहे ना सर्वसामान्यांशी. उलट शिंदे सरकार प्रखर हिंदुत्ववादी सरकार असून शिवसेनेचा खरा विचार तोच आहे. वाचाळवीरांनी याचे भान निश्चित ठेवावे, अशी कडवट टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली
केसरकर यांनी शनिवारी जलमंदिरात राजमाता कल्पनाराजे भोसले यांची भेट घेतली. सातारा शहरात शिवसृष्टी उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी काही प्रस्तावित आराखड्यांवर चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, तहसीलदार अशोक जाधव इत्यादी उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना केसरकर म्हणाले, “”भाजपला आणि शिवसेनेला हिंदुत्ववादी विचारांची पार्श्वभूमी आहे. त्यामुळेच हे समीकरण जुळून खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य आले आहे. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना अजूनही सत्ता गेल्याचे दुःख पचवता आलेले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून बेताल आणि वाचाळ बडबड सुरू आहे.”
शिवसेनेचे नेते व माजी कामगारमंत्री भास्कर जाधव यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांची चोर अशी संभावना केली होती. त्या टीकेचा केसरकर यांनी जोरदार समाचार घेतला. महाराष्ट्राच्या संस्कृतीला वाचाळवीरांचे हे बडबडणे शोभत नाही. त्यांनी आमच्यावर टीका करताना आधी आपण काय केले आहे याचा विचार करावा.
महाविकास आघाडीचे नेते कधीच घरातून बाहेर पडले नाहीत, राज्यामध्ये एखादा वाचाळवीर नेता असला तर त्याचा संपूर्ण पक्षाच्या प्रतिमेवर प्रभाव पडतो. अशी वाचाळ बडबड करणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा देशात आणि परदेशात काय निरोप जातो याचे भान ठेवावे, असा टोला त्यांनी लगावला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा छत्रपतींच्या वंशजानी पुरावे द्यावेत असे धक्कादायक विधान केले होते त्याचाही केसरकर यांनी समाचार घेतला.
ज्यांच्याकडे राजघराण्याचा वारसा आहे तो त्यांच्याकडे राहणारच, आपणच त्या घराण्याचे वारसदार असल्याप्रमाणे कोणीही बडबड करू नये. छत्रपतींचा मान ठेवायचा नाही आणि त्यांनाच पुरावे मागायचे हे नैतिकतेच्या पातळीला धरून नाही, से सांगून त्यांनी मी साताऱ्यात येतो, राजमातांच्या आशीर्वाद घेता, उदयनराजेंशी दिलखुलास संवाद साधतो कारण मी सर्वसामान्य म्हणून येतो आणि त्यांची भेट घेतो, असे स्पष्ट केले.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषदेमध्ये 65 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात केसरकर म्हणाले, “”त्यांनी अधिवेशन कालावधीत लक्षवेधी मांडली होती. महेश शिंदे अभ्यासू आमदार आहेत. खरोखर तसे काही असेल तर त्याची चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवरून चौकशी होईल. या चौकशीत पुढे येईल त्यानुसारच पुढील कारवाईची दिशा स्पष्ट केली जाईल.” जलमंदिरात राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यावतीने दीपक केसरकर यांचे स्वागत करण्यात आले.
शिवसृष्टीबाबत चर्चा
सातारा शहरातील विकास कामांच्या संदर्भाने आणि शहरातील योग्य ठिकाणी शिवसृष्टी उभी करण्यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कोणती जागा उपलब्ध करून देता येईल, यासंदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि दीपक केसरकर यांनी चर्चा केली. तसेच या शिवसृष्टीसंदर्भातील प्रकल्पात रेखीवपणा येण्याकरता कल्पनाराजे भोसले यांनीसुद्धा काही सूचना मांडल्या.