नेवासा – अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी सर्वपक्षीयांच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची आर्थिक मदत मिळाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी यावेळी बोलताना केली.
यावेळी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांना वीज बिलात शंभर टक्के माफी द्यावी, नेवासा तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, 31 ऑक्टोबर 2019 पर्यंतची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी या मागण्या मांडण्यात आला आहेत. या निवेदनावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, तालुकाध्यक्ष काशिनाथ नवले, कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ नेते कॉ. बाबा आरगडे, कॉ. आप्पासाहेब वाबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष गफूरभाई बागवान,तुकाराम मिसाळ, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष दादासाहेब गंडाळ, डॉ. अशोकराव ढगे, ज्ञानेश्वरचे संचालक अनिल हापसे,राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार, कॉ.लक्ष्मण कडू, जनार्धन पटारे, अशोक डौले, म.गो.डांगे, प्रा.भाऊसाहेब सावंत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग अभंग म्हणाले, नेवासा तालुक्यात सरासरी 160 ते 180 मिलिमीटर इतकी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन, मका, बाजरी, कांदा, कपाशी, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जवळजवळ ही सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातून गेलेली आहेत. मागील वर्षीचा भयानक दुष्काळ व यंदाची झालेली अतिवृष्टी यामुळे नेवासा तालुक्यातील शेतकरी हा पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. याबाबत शासनाने पंचनामे करण्याचे कामे युद्धपातळीवर हाती घ्यावे व हेक्टरी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावी. कॉ. बाबा आरगडे म्हणाले, शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला 31 ऑक्टोबर 2019 पर्यंतची संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा यांना सर्वपक्षीयांच्या वतीने निवेदन देण्यात आले.