मुंबई – कथीत करचुकवेगिरी प्रकरणात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी झी माध्यम समूहाच्या कार्यालयाची तपासणी करून कागदपत्रे ताब्यात घेतली. या माहितीला झी समूहाने दुजोरा दिला आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यालयाला भेट दिली आणि काही विचारणा केली. आमचे अधिकारी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे देऊन तपासात सहकार्य करीत आहेत.
झी समूहाच्या कोणत्या शहरातील कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या याची माहिती प्रवक्त्याने दिली नाही. मात्र प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, झी समूहाच्या मुंबई आणि दिल्ली येथील कार्यालयाची तपासणी करण्यात आली. एकूण 15 ठिकाणी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र या संदर्भातील तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. झी समूहाचे संस्थापक सुभाष चंद्र हे राज्यसभेचे सदस्य आहेत. गेल्या एक वर्षापासून झी-समुहापुढे खेळत्या भांडवलाचा प्रश्न निर्माण झाला असून कंपनी काही गरज नसलेले विभाग कमी करीत आहे.