पुणे – महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे. तर दुसरीकडे या निवडणुकांमध्ये भाजप-मनसे अशी युती अस्तित्वात येऊ शकते अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. असं असतानाच आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच याबाबत भाष्य केलं आहे. याखेरीज त्यांनी मनसेला भाजपसाबाबत यायचं असल्यास एक अट देखील घातली आहे.
“जोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना परप्रातियांबद्दलची भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,” असं पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. ते पुण्यात माध्यमांशीबोलत होते.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
“मी वारंवार याबद्दलची भूमिका मांडली आहे. मी एक वाक्य दरवेळी म्हटलंय की, जोपर्यंत मनसे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही. भूमिका बदलत नाही म्हणताना आम्ही स्थानिक लोकांना नोकऱ्या देऊ नका असं म्हटलेलं नाही. स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या द्या, असा कायदाच आहे. त्यामुळे नव्यानं भांडण्याचं कारण नाही. कायदाच आहे. शेवटी तुमचा (मनसेचा) विरोध कशाला आहे?”
“परप्रांतियांनी टॅक्सी चालवण्याला, रिक्षा चालवण्याला की व्यवसाय करण्याला विरोध आहे? मग देशातल्या सर्व राज्यांत मराठी भाषिक आहेत. जबलपूर, इंदौर सारख्या शहरात लाख लाख मराठी आहेत. अशा प्रकारे हा देश एक असताना, पोट भरण्यासाठी आलेल्यांना विरोध करणं तोही संघर्ष करणं आम्हाला मान्य नाही. आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. मी राज ठाकरे यांची स्तुती करता करता, मनसे अनेक प्रश्न सोडवते असं म्हटलंय. पण जोपर्यंत ते परप्रातियांबद्दल भूमिका बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांची आमची युती होऊ शकत नाही,”